धारावीतील पहिला टप्प्यातील घरे 2028 पर्यंत मिळणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

धारावी (dharavi) पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करून मार्च 2028 पर्यंत लाभार्थ्यांना घरे हस्तांतरित करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सोमवारी दिली.

या टप्प्यात किमान दहा हजार घरे तयार करून पात्र रहिवाशांना हस्तांतरित करण्याचा सरकारची योजना आहे, असे ते म्हणाले. या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी आयोजित केलेल्या एका बैठकीत ते बोलत होते.

हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि परवानग्या जलद मिळण्यासाठी 'सिंगल-विंडो' प्रणाली लागू करण्याचे निर्देश फडणवीस यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

प्रकल्पांतर्गत धारावीतील पुनर्वसन इमारती 42 महिन्यांत, तर माटुंग्यातील पुनर्वसन काम 39 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईला (mumbai) एक नवी जागतिक ओळख मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

धारावीतील पुनर्वसन इमारतींचे काम 42 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यातील काम मार्च 2028 पर्यंत पूर्ण करून हस्तांतरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टरप्लॅन सरकारपुढे सादर करून एक वर्ष उलटला आहे. आतापर्यंत राज्य सरकारकडून या आराखड्याला मान्यता मिळालेली नाही.

सोमवारी झालेल्या या आढावा बैठकीत हा प्लॅन मुख्यमंत्र्यांसोमर सादर करण्यात आला. धारावीतली कुंभारवाड्यातील नागरिकांचा या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध आहे.

परदेशी पर्यटकांमध्ये कुंभारवाडा प्रसिद्ध आहे. या परिसराची वेगळी ओळख जपूनच विकास आराखडा तयार केला जाणार आहे.

धारावीतील बस आगाराच्या जागेमध्ये रहिवासी आणि व्यावसायिक संकुल उभारणार आहेत. त्याशिवाय धारावीमध्ये मल्टीमोडाल ट्रान्सपोर्ट कॉरिडोर विकसित करण्यात येणार आहे.

या भागात अनेक मेट्रो मार्गिकांसह पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे (harbour railway) मार्गांसाठी एक हब तयार केले जाणार आहे. भविष्यात बुलेट ट्रेन (bullet train) स्थानकासोबतही धारावीला जोडण्याची योजना आहे.

धारावीमध्ये मुंबई विमानतळावरील प्रवाशांसाठी सिटी चेक इन सेवा सुरू करण्यात येणार आहे. सामान तपासण्याचं काम विमानतळावर पोहोचण्यापूर्वी इथेच करण्यात येणार आहे.

त्यानंतर एअरपोर्ट एक्सप्रेस सर्व्हिसद्वारे ते पुढे विमानतळापर्यंत जातील. शिवाय विमानतळापर्यंत जाण्यासाठी एक जेट्टीही उभारण्याची योजना आहे.

तसेच त्यामुळे जलमार्गे प्रवासी प्रवास करू शकतात. भविष्यात एअर टॅक्सी सेवांसाठीही पोर्ट बांधण्यात येऊ शकतो.


हेही वाचा

BKC मध्ये साप्ताहिक ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट डे’ची सुरुवात

मुंबईतील पाणी टँकर चालकांचा 8 जूनपासून सेवा बंदचा इशारा

पुढील बातमी
इतर बातम्या