लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका; मुख्यमंत्र्यांचा शेवटचा इशारा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गर्दी आणि नियम न पाळल्याने राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचं पालन करावं, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी इशारा दिला. 

आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्येसुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखं सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरु झाले होते. मात्र अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचं भान ठेवावं, असंही ते म्हणाले.

हेही वाचा- आरोप सिद्ध करून दाखवा नाहीतर.., वरूण सरदेसाईंचा नितेश राणेंना इशारा

मागील वर्षी विशेषत्वाने झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसू लागला होता. यावेळी मात्र तो इमारती, बंगले, सोसायट्यांमध्ये दिसतो आहे. याचं कारण म्हणजे समाजातील या वर्गाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना भेटणे, हॉटेलिंग, मॉल्समध्ये जाणे सुरु झालं आहे, त्यामुळे परिवारातल्या सर्व सदस्यांत एकदम फैलाव होत आहे.

मागील आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले असता एका हॉटेलमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांनी मास्क न घातलेला व सुरक्षित अंतर न पाळता गर्दी झाल्याचा अनुभव आल्याचं त्यांनी आपणास सांगितलं. हॉटेल्स आणि उपाहारगृहे हे भेटीगाठी व जेवण-नाश्त्याचं प्रमुख ठिकाण असून सुरुवातीच्या काळात नियमांचं पालन होताना दिसत होते. हॉटेल्समध्ये समोरासमोर न बसवता सुरक्षित अंतर ठेऊन बसविणे, वेटर्स आणि इतर कर्मचारी यांनी मास्क घालणे, जंतुनाशक फवारणी, असं होत होतं. 

पण राज्यभरात आता काही हॉटेल्स, मॉल्स, उपाहारगृहांत नियमांची पायमल्ली होऊन वातावरण सैल झाल्यासारखे प्रशासनाला दिसत आहे. अजूनही परिस्थिती आपल्या हातात आहे, आपण स्वत:हून आमच्या एसओपीचे पालन नीट व काटेकोरपणे झालंच पाहिजे हे पहा. सर्वजण नियम धुडकावत आहेत असं नाही, पण काही नियम न पाळणाऱ्यांमुळे धोका वाढतोय असंही ते म्हणाले. लॉकडाऊन लावून सगळे बंद करणं आम्हालासुद्धा आवडत नाही. आपण हे अर्थचक्र सुरु केले आहे, सर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग (coronavirus) रोखता येईल, त्यामुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

पालिका आणि पोलीस प्रशासनाने देखील यासंदर्भात राज्यातील सर्व हॉटेल्स व उपाहारगृहे काटेकोर पालन करतात किंवा नाही तसेच नियम तोडत असतील तर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा- शिवसेना कुणातरी वाचवण्याचा प्रयत्न करतंय का? राष्ट्रवादीकडून खुलासा
पुढील बातमी
इतर बातम्या