भाजपचे आमदार नितेश राणे यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत नाहीतर कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं, असा इशारा युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी दिला.
नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी वरूण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब देखील होते. यावेळी वरूण सरदेसाई म्हणाले, नितेश राणे यांनी माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केले आहेत. हे सगळे आरोप तथ्यहीन आहेत. नितेश राणे यांनी हे आरोप सिद्ध करून दाखवावेत नाहीतर मी त्यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल करणार आहे.
मी एका सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित कुटुंबातील असून मला राजकारणाची आवड असल्यानेच युवासेना, शिवसेनेचं काम करतो. मी कुठल्याही प्रकारचं घाणेरडं काम केलेलं नाही.
याउलट माझ्यावर आरोप करणाऱ्या राणे कुटंबाची पार्श्वभूमी सगळ्यांनाच ठाऊक आहे. मग अगदी त्यांची ती सुरूवातीची गँग असो, त्यानंतर त्यांच्याविरोधात खून, अपहरण, खंडणी असे नोंदवण्यात आलेले विविध गुन्हे असोत, या सगळ्याचा पाढा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत मांडला आहे. तो रेकॉर्डवर देखील आहे.
हेही वाचा- शिवसेना कुणातरी वाचवण्याचा प्रयत्न करतंय का? राष्ट्रवादीकडून खुलासा
Nitesh Rane has made baseless allegations against me. People know the history of Rane family so I don't need to say much on that. I will file a criminal defamation against him if he fails to apologize: Yuva Sena Secretary Varun Sardesai https://t.co/x8N6FrPT0g pic.twitter.com/iDvdDHLlLi
— ANI (@ANI) March 15, 2021
संपूर्ण राणे कुटुंबीयांना कुणावरही उठसूठ आरोप करण्याची सवयच लागली आहे. काँग्रेसमध्ये असताना असेच आरोप त्यांनी भाजपच्या नेत्यांवर केले आणि आता भाजपात गेल्यावर ते महाविकासआघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत.
मागच्या काही दिवसांपासून ते माझ्यावरही वैयक्तिकरित्या आरोप करत आहेत. खरंतर राणे कुटुंबीयांना महाराष्ट्रातील जनता अजिबात गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे मी देखील सुरूवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु हा प्रकार वाढू लागल्याने त्याला आवर घालणंही गरजेचं आहे, असं म्हणत वरूण सरदेसाई यांनी नितेश राणे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.
दरम्यान आयपीएलवर सल्ला लावणाऱ्या सट्टेबाजांना सचिन वाझेंकडून फोन जातो. दीडशे कोटी रुपये न दिल्यास छापा मारू, अशी धमकी दिली जाते. त्यानंतर असाच फोन वाझेंना जातो आणि हिश्श्याची मागणी केली जाते. ही व्यक्ती म्हणजे वरुण सरदेसाई. कोणत्याही घटनात्मक पदावर नसलेल्या सरदेसाई यांना ठाकरे सरकारकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. शासकीय बैठकांनाही ते उपस्थित असतात. अधिकाऱ्यांना ते थेट दूरध्वनी करतात. त्यामुळे सरदेसाईंनी वाझे यांच्याशी कोणत्या कारणासाठी किती वेळा संपर्क साधला याचीही चौकशी ‘एनआयए’ने करावी, अशी मागण नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेतून केली होती.
(yuva sena leader varun sardesai replies nitesh rane allegations)