मुंबई आणि उपनगरात गेल्या 4 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले पाहायला मिळाले. रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारपर्यंत अजिबात विश्रांती घेतलेली नाही.
पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही रेल्वेच्या मार्गात तांत्रिक बिघाड झाला. बुधवारी सकाळी मानखुर्द स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक जवळपास अर्धा तास उशिराने सुरू होती.
ट्रेनला उशीर होईल म्हणून मुंबईकरांनी रस्त्यांवरील वाहनांचा पर्याय निवडला. पण, तोही पर्याय चुकीचा ठरला. प्रवाशांना अर्धा अर्धा तास ट्रॅफिकच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. शिवाय रस्त्यांवरील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. शाळेतील मुलांना याच पाण्यातून शाळेची वाट काढावी लागली.
रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईची दाणादाण उडवली आहे. बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे. रविवार 25 जून रोजी जुहू कोळीवाडा येथे समुद्रात बुडालेल्या दोन मुलांपैकी अंकुर बेटकर या 17 वर्षीय मुलाचा मृतदेह मंगळवारी पहाटे 5.45 वाजता पोलिसांना समुद्र किनारी आढळून आला. बांगूरनगर, मालाड पश्चिगम येथे सोमवारी खाडीत पडलेल्या रमेश पवार या 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
मुंबई शहरासह उपनगरात येत्या 24 तासात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसतील. काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. दरम्यान, आतापर्यंत कुलाबा येथे 18.63 टक्के तर सांताक्रूझ येथे 14.87 टक्के पाऊस झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
मुंबईकरांनो, लाटांशी उगाच खेळू नका!
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)