मुंबईत आगीची दुघर्टना घडल्यास अग्निशमन दलाच्या जवानांप्रमाणे आग विझवण्याच्या कार्यात मदत व्हावी म्हणून अग्निशमन दलाने मुंबईच्या कानाकोपऱ्यातून ५ हजार प्रशिक्षित स्वयंसेवकांची निवड केली. मात्र एवढी मोठी स्वयंसेवकांची फौज हाती असूनही नियोजन शून्यतेच्या आभावामुळे आगीच्या घटनांवर ताबा ठेवण्याचं काम अग्निशमन दलाला जमलेलं नाही.
मुंबईत मागच्या काही महिन्यांमध्ये साकीनाका फरसाण कारखाना, कमला मिल कंपाऊंड, अंधेरी, घाटकोपर अशा ठिकठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीच्या घटनांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान होण्यासोबतच अनेक निष्पाप व्यक्तींचे बळी गेले आहेत.
आग लागल्यानंतर अग्निशमन जवानांना काही वेळेस झोपडपट्टी, कमी रुंदीचे रस्ते इ. कारणांमुळे घटनास्थळी तात्काळ पोहोचणं शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेता ५ वर्षांपूर्वी मुंबईत आगीच्या दुघर्टनांमध्ये वाढ झाल्यानंतर मुंबईतील ३३ अग्निशमन दल केंद्रावर दर रविवारी सर्वसामान्यांना आग विझवण्याचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने २०१४ मध्ये प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचा निर्णय अग्निशमन दलाने घेतला.
त्यानुसार सर्वसामान्यांमधून स्वयंसेवक निवडून अग्निशमन दलाने त्यांना आग विझवण्याचं प्रशिक्षण दिलं. असे ५ हजारहून अधिक प्रशिक्षित स्वयंसेवक असून जे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी तिथं जाऊन प्राथमिक उपाययोजना करू शकतात, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली.
अग्निशमन दलाकडे जर ५ हजारांहून अधिक प्रशिक्षित स्वयंसेवकांची फौज असेल. तर या फौजेचा योग्य वापर करण्यात अग्निशमन दलाला अपयश आलं आहे, असंच म्हणावं लागेल. कारण तसं नसतं तर मोठ्या आगीच्या घटना वगळता अग्निशमन दलाला लहान आगीच्या घटनांवर नक्कीच नियंत्रण मिळवता आलं असतं, असं म्हटलं जात आहे.
मुंबईतील झोपडपट्टी, कमी रुंदीच्या गल्ल्या, रस्ते इ. अडचणीच्या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने तात्काळ पेाहोचू शकत नसल्यामुळे संपूर्ण मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी जलद प्रतिसाद वाहने ठेवण्यात आल्याचं रहांगदळे यांनी सांगितलं.
हेही वाचा-
कमला मिल आग: २ महिन्यांनी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
‘नवरंग’ स्टुडिओच्या मालकावर गुन्हा दाखल, जुन्या चित्रफितींमुळे आग फोफावली