मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यात मंगळवार दुपारी १२ वाजल्यापासून ४७ मिनिटांनी मुंबईत हाई टाइडचा इशारा दिला आहे. या काळात ४.५१ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. पालिकेनं नागरिकांना समुद्र किनाऱ्यांवर न जाण्याच्या सुचना केल्या आहेत.
मुंबईत सोमवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यात १२ वाजून ४७ मिनिटांनी येणाऱ्या भरतीमुळे सखल भागात पाण्याचा निचरा होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घरातच रहावं, अशा सुचना पालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत.
मुंबईत येत्या २४ तासात अतिवृष्ठीचा इशारा देण्यात आल्यामुळे मंगळवारी सुट्टी जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये आस्थापन बंद ठेवण्याचं आवाहन मुंबई महानगर पालिकेनं केलं आहे.
हवामान विभागानं मुंबई आणि परिसरास सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात केवळ हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानंच हजेरी लावली. सोमवारी सायंकाळी उशिरा दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईत जोरदार पावसाच्या सरी आल्या. या भागात सुमारे २० ते ४० मिमी पाऊस झाला. तर भायखळा आणि परिसरात ४० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. पश्चिम उपनगरे, मीरा भाईंदर आणि ठाणे परिसरात १० ते २० मिमी पावसाची नोंद झाली. उर्वरीत ठिकाणी हलका (५ ते १० मिमी) पाऊस नोंदविण्यात आला.
हेही वाचा