१ कोटी मजुरांनी लॉकडाऊनमध्ये पायी घर गाठलं, सरकारची संसदेत माहिती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनामुळे गेले काही महिने कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. सध्या लॉकडाऊनमधून अंशत: सवलत देण्यात आली आहे. पण असं असलं लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले.

उपजिविकेसाठी विविध राज्यामध्ये असणाऱ्या मजुरांनी लॉकडाऊननंतर स्वगृही परतण्यास सुरुवात केली. मात्र वाहतुकीची साधनं उपलब्ध नसल्यानं असंख्य मजुरांना रस्त्यावर उतरत पायी घर गाठावं लागलं.

लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मार्च २०२० ते जून २०२० दरम्यान एक कोटीहून अधिक मजुरांनी आपआपल्या राज्यात पायी स्थलांतर केलं. तर अनेक मजुर यात जखमी झाले. तर काहिंना आपला प्राण देखील गमवावा लागला. सरकारनं अशी माहिती मंगळवारी लोकसभेत लिखीत स्वरुपात दिली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं की, कोविड 19 महामारीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर मजूरांनी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केलं. कामगार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जवळापास १.०६ कोटी मजुरांनी स्थलांतर केलं. यामध्ये पायी प्रवास केलेल्या मजुरांचाही समावेश आहे.

मार्च-जून २०२० दरम्यान ८१ हजार ३८५ रस्ते अपघात झाले. यामध्ये जखमींचा आकडा २९ हजार ४१५ आहे, अशी माहिती त्यांनी संसदेत दिली. मात्र स्थलांतरादरम्यान रस्ते अपघातात मरण पावलेल्या मजुरांसंदर्भात मंत्रालयानं स्वतंत्र डेटा ठेवलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.


हेही वाचा

मुंबईत ३३ लाख नागरिक कंटेन्मेंट झोनमध्ये

COVID केअर सेंटरमधील प्रलंबित कामं ७ दिवसात पूर्ण करा : राजेश टोपे

पुढील बातमी
इतर बातम्या