ई-पास बंदीसाठी हायकोर्टात जनहित याचिका

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचा आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे ई-पास मिळत नाही.एजंटमार्फत लगेच ई पास मिळतो, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे ई-पास बंद करा अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मयुरेश जोशी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. 

 ई-पास चा मूळ उद्देश सफल होत नसून  नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने ई-पास पद्धत पूर्णपणे बंद करावी, अशी विनंती जोशी यांनी याचिकेत केली आहे. अनेक वेळा मेडिकल इमर्जन्सी, नातेवाईकांचे मयत, व्यावसायिक मीटिंग अशी अत्यावश्यक कारणे देऊन सुद्धा ई-पास मिळत नाही. काही फालतू कारणं देऊन नाकारला जातो. तर कधी एखाद्या क्षुल्लक कारणासाठी पास मिळतो. ई-पास मान्य किंवा अमान्य करण्यासाठी यंत्रणेमध्ये कोणताही योग्य समन्वय नसल्याचं मयुरेश जोशी यांनी म्हटलं आहे.

ई-पास च्या या गोंधळात दलालांची एक मोठी टोळी सक्रिय झाली आहे. यासाठी सोशल मीडियावर जाहिराती देण्यात आल्या आहेत. एक हजार ते पाच हजार रुपये घेऊन हे दलाल तुमचा पास दुसऱ्या दिवशी आणून देतात. सामान्य माणसाला पास मिळत नाही, मग एजंटला कसा काय मिळतो? हे दलालांचे मोठे रॅकेट असून राज्य सरकारमधील कोणत्यातरी मोठ्या मंत्र्यांचा यासाठी राजाश्रय आहे का?, असे प्रश्न जोशी उपस्थित केले आहेत.


हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा तलाव ओव्हरफ्लो

बेस्टच्या १,५६६ कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात


पुढील बातमी
इतर बातम्या