लव्हाटे दाम्पत्याने इच्छामरणाची मागणी घेतली मागे

  • मुंबई लाइव्ह टीम & सोनाली मदने
  • सिविक

आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या, नाहीतर आम्ही दोघं एकमेकांची हत्या करू, असं म्हणत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिणारे गिरगावमधील नारायण (८६) आणि त्यांच्या पत्नी इरावती लव्हाटे (७९) यांनी अखेर आपली इच्छामरणाची मागणी मागे घेतली आहे. जेव्हा 'तो' बोलावणं धाडेल, तेव्हाच आम्ही जाऊ असं म्हणत या दाम्पत्याने आपला विचार बदलला आहे.

सुखी आयुष्य असूनही...

गिरगावमधील ठाकूरद्वार इथं राहणारे नारायण आणि इरावती लव्हाटे एसटी महामंडळात अकाऊंटंट म्हणून कार्यरत होते, तर इरावती आर्यन हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. या दाम्पत्याला मुलबाळ नसलं, तरी दोघांनीही आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात एकमेकांना साथ दिली. या दाम्पत्याला कोणताही आजार नाही, पण आयुष्यभर सोबत राहिल्यानंतर मरणही सोबत पत्करावं या इच्छेने लव्हाटे दाम्पत्याने सरकारकडे इच्छामरणाची मागणी केली.

मागणीचं आक्रमक रूप

हे दाम्पत्य मागील ३० वर्षांपासून इच्छामरणाचा कायदा देशात यावा यासाठी पाठपुरावा करत होते. आपल्याला इच्छामरणाची परवानगी मिळावी यासाठी त्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिलं, पण त्यांच्याकडून काहीही उत्तर न आल्याने शेवटी त्यांनी आपल्या पत्नीचा खून करण्याची परवानगी मिळावी, असे पत्र सरकारला पाठवलं होतं.

अखेर निर्णय मागे

इच्छामरणाच्या परवानगीची आतुरतेने वाट बघणाऱ्या या दाम्पत्याला सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी आपला निर्णय अखेर मागे घेतला आहे.


हेही वाचा-

इच्छामरणाचा निर्णय अन्यायकारक, लव्हाटे दाम्पत्याचा आरोप


पुढील बातमी
इतर बातम्या