गेली कित्येक वर्ष इच्छामरणाच्या कायद्यासाठी लढत असलेल्या लव्हाटे दाम्पत्याने त्यांच्या इच्छामरणाच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली आहे. ३१ मार्चपर्यंत हे दाम्पत्य राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना इच्छामरणाबाबत दिलेल्या पत्राच्या उत्तराची वाट बघत होते. पण, कुठलाच प्रतिसाद न आल्याने त्यांनी त्यांचा इच्छामरणाचा निर्णय तूर्तास स्थगित केला आहे. शिवाय, 'असं जरी असलं तरी आपली इच्छामरणाची इच्छा कायम राहील', असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
गिरगावच्या झावबावाडीतील इरावती लव्हाटे (७८) आणि नारायण लव्हाटे (८७) हे जोडपं त्यांच्या मरणाच्या इच्छेने गेली अनेक वर्षेत चर्चेत आहे. आयुष्यभर एकमेकांना साथ दिल्यानंतर आता मृत्यू येणार हे अटळ आहे. परंतु, त्याची वाट न बघता तो एकत्र यावा, धडधाकट असताना यावा आणि अवयवदान करता यावे, अशी त्यांची इच्छा होती.
या दोघांनी गेल्या काही वर्षांपासून इच्छामरणाची मागणी लावून धरली होती. शिवाय, त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ३१ मार्च २०१८पर्यंत उत्तराची अपेक्षा व्यक्त केली होती. या पत्रात त्यांनी 'इच्छामरणासाठी परवानगी द्या, अन्यथा आत्महत्या करू', असा इशाराही दिला होता. पण, या पत्रावर राष्ट्रपतींकडून कोणतेही उत्तर आले नसल्याचं इरावती लव्हाटे यांनी सांगितलं.
या विषयावर सर्वांसोबत केलेल्या चर्चेमुळे आणि प्रभू रामचंद्र आणि गजानन महाराज यांच्यावर असलेल्या नितांत श्रद्धेमुळे आमच्या विचारात बदल घडला आहे. त्यामुळे, सध्या तरी इच्छामरणाच्या इच्छेला स्थगिती दिली आहे.
इरावती लव्हाटे
हेही वाचा
इच्छामरणाचा निर्णय अन्यायकारक, लव्हाटे दाम्पत्याचा आरोप