मरणासन्न अवस्थेत गेलेल्या आजारी व्यक्तींना इच्छामरण हवं असल्यास सशर्त परवानगीनुसार इच्छामरण देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिला. हा निर्णय आमच्यासाठी अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया नारायण आणि त्यांच्या पत्नी इरावती लव्हाटे यांनी दिली.
ज्यांना इच्छामरण हवं आहे त्यांना तुम्ही जगायला लावत आहात. हा निर्णय जे व्यक्ती अंथरूणाला खिळले आहेत, त्यांच्यासाठी आहे. धडधाकट व्यक्तींसाठी नाही. आम्ही फक्त आमच्या दोघांविषयी बोलत आहोत. त्यामुळे आम्हाला फाशी द्यावी हीच आमची मागणी असल्याचं लव्हाटे दाम्पत्याने सांगितलं.
लवाटे दाम्पत्य दक्षिण मुंबईतील चर्नीरोडजवळच्या ठाकुरद्वारमध्ये राहतं. या दाम्पत्याला मुलं नाहीत तसंच कुठला गंभीर आजारही नाही. वयानुसार समाजासाठी आपला काहीही उपयोग नसून स्वतःचा सांभाळ करण्यासाठी आपण आता सक्षम नाही, असं या दाम्पत्याला वाटतं आहे. त्यांनी अवयवदान केलं असून एकमेकांवर ओझं न ठरता धडधाकट असतानाच मरणं यावं, अशी त्यांची इच्छा आहे.
डिसेंबर २०१७ मध्ये लव्हाटे दाम्पत्याने पत्राद्वारे इच्छामरणाची मागणी राष्ट्रपतींकडे केली होती. पण, आतापर्यंत त्यांच्या पत्रावर राष्ट्रपतींनी उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे ३१ मार्च २०१८ पर्यंत सरकारने त्यांच्या पत्रावर भूमिका घेतली नाही, तर आम्ही एकमेकांचा खून करु आणि त्याला सरकार जबाबदार असेल, अशी भूमिका या दोघांनी स्पष्ट केली.
जोपर्यंत आम्ही धडधाकट आहोत तोपर्यंत आम्हाला इच्छामरण द्या, उद्या आमच्यापैकी एकजण जरी अंथरूणाला खिळलं, तरी त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागेल. हेच आम्हाला नको आहे. त्यामुळे आमच्या मागणीचा राष्ट्रपतींनी विचार करावा. सुप्रीम कोर्टाचा निर्णय निराशावादी असल्याची प्रतिक्रिया लव्हाटे दाम्पत्याने दिली.
हेही वाचा-
सुप्रीम कोर्टाचा निर्णय: इच्छा मरणाला सशर्त परवानगी