राज्यात ८ ते १० दिवसांपुरताच रक्तसाठा शिल्लक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात यापुढे आठ ते दहा दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध असून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असं आवाहन, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपुरवठा, पीपीई कीट, मास्क याची उपलब्धता जाणून घेण्यासाठी उत्पादकांसोबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. त्यानंतर टोपे यांनी ही माहिती दिली.

या बैठकीला अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, हाफकिन संस्थेचे कार्यकारी संचालक राजेश देशमुख यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोना झालेल्या व्यक्तीला उपचाराचा भाग म्हणून रक्ताची आवश्यकता नसली तरी अशा व्यक्तीला जर ॲनेमिया किंवा इतर आजार असतील अशा परिस्थितीत त्याला रक्ताची आवश्यकता निकड भासू शकते. तसंच इतर शस्त्रक्रिया, बाळंतपण आणि थॅलेसेमिया, काही कॅन्सर सारख्या आजारपणासाठी रक्ताची आवश्यकता असते, असे ते म्हणालेत. त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं. 


राज्यातील सर्व ब्लड बॅंक यांचा व्हॉट्‍सॲप गृप तयार करुन वेळोवेळी याची माहिती घेतली जाते. आपल्या जवळच्या ब्लड बॅंकेत, रुग्णालयात किंवा आपल्या सोसायटीमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करुन रक्तदान करावे, असंही  आवाहन डॉ. शिंगणे यांनी केलं आहे. सध्या राज्यात उपलब्ध असलेला रक्तसाठा लक्षात घेता रक्तदात्याची संपूर्ण सुरक्षितता राखून छोटे छोटे कॅम्प घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.


हेही वाचा -

खासगी नर्सिंग होम, रुग्णालय सुरू न केल्यास होणार कारवाई

नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर


पुढील बातमी
इतर बातम्या