कळवा, मुंब्रा, दिवामध्ये तीव्र पाणी टंचाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) गेल्या आठवड्यात हाती घेतलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे विस्कळीत झालेला ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही.  त्यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसंच वागळे इस्टेट, डोंबिवली औद्योगिक पट्ट्यात पाण्याअभावी कंपन्या बंद ठेवण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे.

मागील गुरुवारी एमआयडीसीने जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं होतं. त्यासाठी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवला होता. मात्र, मुदतीत काम न झाल्याने आणखी १६ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. एमआयडीसीनेही शनिवारी सकाळी काम पूर्ण झाल्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु केला आणि सायंकाळी पाण्याचा दाब वाढवला. मात्र, या दाबावर नियंत्रण ठेवण्यात अभियंता विभागाला अपयश आले.

शिळफाटा मार्गावरील खिडकाळीजवळ जलवाहिनी फुटली. त्यामुळे ठाण्यासह आसपासच्या शहरांचा पाणीपुरवठा पुन्हा खंडीत झाला. जलवाहिन्या दुरुस्तीचं काम करून एमआयडीसीने रविवार दुपारनंतर शहरांचा पाणीपुरवठा पूवर्वत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत वितरण व्यवस्था कोलमडली. परिणामी कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. ठाणे महापालिकेने इतर स्त्रोतांचे पाणी कळवा, मुंब्य्राकडे वळविले. त्यामुळे घोडबंदर, वर्तकनगर पट्टयात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. 


हेही वाचा -

सीरम लसीचा साठा वेगवेगळ्या शहरांमध्ये रवाना, महाराष्ट्राला मिळाले ९ लाख ६३ हजार कोरोना डोसेस

दिलासादायक! मुंबई-मडगाव एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंत


पुढील बातमी
इतर बातम्या