वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान सामना होणारच; आयसीसीचं स्पष्टीकरण

काश्मिरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहिद झाले. त्यामुळे आगामी विश्वचषक स्पर्धेत भारतानं पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. मात्र, विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान सामन्याला कोणताही धोका नसून, दोन्ही देशांमधील सामना होणार असल्याचं स्पष्टीकरण सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी दिलं आहे.

करारामुळे खेळणं बंधनकारक

भारत आणि पाकिस्तान दोन्ही क्रिकेट मंडळं आयसीसीशी केलेल्या कराराला बांधील आहेत. त्यामुळं या दोन देशांमधील सामना होण्यास कोणतीही अडचण येणार नाही, अशी खात्री रिचर्डसन यांनी दिली आहे. तसंच, आयसीसीच्या सर्व स्पर्धांसाठी सर्व संघांचे सदस्य भागीदारीच्या करारावर स्वाक्षऱ्या करतात. त्या करारानुसार त्यांना या स्पर्धेतील सामने खेळणं बंधनकारक आहे. मात्र, एखाद्या संघाने सामना खेळण्यास नकार दिला, तर त्याच्याविरुद्ध खेळणाऱ्या संघाला अतिरिक्त गुण दिले जातात. त्यामुळं गुण गमवायचे नसतील तर भारताला पाकिस्तानविरुद्ध खेळावचं लागेल, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.

भारतीय संघाच नुकसान

अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या क्रिकेट विश्वचषकाची तयारी सुरू झाली आहे. तसंच, येत्या १६ जून रोजी विश्वचषक स्पर्धेतला भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. मात्र, पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारताने पाकिस्तानाविरुद्ध हा सामना खेळू नये, अशी मागणी केली जात होती. त्याशिवाय, बीसीसीआयच्या समितीने आयसीसीला पत्र लिहून पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, सामना खेळला नाही, तर त्यामध्ये भारतीय संघाचंच नुकसान होऊ शकतं, असं आयसीसीने म्हटलं आहे.


हेही वाचा -

पगार पुढे ढकलल्यामुळे बेस्ट कामगारांचे आज आंदोलन

रेल्वे भरतीत बाहेरचे घुसणार नाही यावर लक्ष ठेवा; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश


पुढील बातमी
इतर बातम्या