बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात असल्याने कामगारांचा पगार दिवसेंदिवस लांबत चालला आहे. काही दिवसांपूर्वी बेस्ट प्रशासनानं कामगारांचा पगार पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बेस्ट कामगार मंगळवारी आंदोलन पुकरणार असल्याची समोर आली आहे. वडाळा आगाराजवळ दुपारी ३ वाजता कामगार संघटनेकडून निदर्शनं करण्यात येणार असून बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं केली जाणार आहेत.
बेस्ट उपक्रम आर्थिक तोटा सहन करत असल्यामुळं प्रशासनाने कामगारांच्या पगारासह बाकीच्या खर्चासाठी आर्थिक चणचण येत असल्याची भूमिका घेत औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी कामगारांना फेब्रुवारीचा पगार ३० मार्चला आणि पुढील तीन महिन्यांचे पगार २० तारखेस देण्याची विनंती बेस्टनं न्यायालयात केली होती. या विनंतीला औद्योगिक न्यायालयानं मंजुरी दिली. त्यामुळे कामगारांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, यापूर्वी बेस्ट प्रशासनानं कर्मचारी संघटनेशी झालेल्या करारानुसार १५ तारखेपर्यंत पगार देण्यास संमती दर्शवली होती. पण आता आर्थिक स्थिती डबघाईची झाल्यानं १५ तारखेसही पगार देणं अवघड ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. कामगारांना दरमहा पगार देण्यासाठी बेस्ट उपक्रमाला १०० कोटी रुपयांचा निधी आवश्यकता असते. मात्र, निधीची कमतरता असल्यामुळे उपक्रमाला बँकांमधून कर्ज काढावी लागतात. मात्र, सद्यस्तितीत बेस्टसमोर आर्थिक समस्या वाढल्यामुळे कामगारांच्या पगाराची तारीख पुढे ढकलल्याचे समजते आहे.
हेही वाचा -
रेल्वे भरतीत बाहेरचे घुसणार नाही यावर लक्ष ठेवा; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश