ज्वेलर्सच्या मालकानं ग्राहकांना ३०० कोटींना गंडवलं

ग्राहकांना गुडविन ज्वेलर्सनं मोठा गंडा घातल्याचं उदाहरण ताजे असताना आता, अजून एका ज्वेलर्सनं ग्राहक आणि गुंतवणूकदरांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. घाटकोपरच्या पंतनगर येथील रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सनं ग्राहकांना तब्बल ३०० कोटींना गंडवलं आहे. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. 

सोनं देण्याचं आश्वासन

भिशीच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे घ्यायचे आणि वर्षभरानंतर तेवढ्याच पैशांचं सोनं देण्याचं आश्वासन दुकान मालकाकडून दिलं गेलं. त्यानुसार, बहुसंख्य लोकांनी दुकान मालकाकडं लाखो रुपये गुंतवले. मिळालेल्या माहितीनुसार, २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सचं दुकान बंद होतं. त्यानंतर व्हॉट्सअॅपवरुन हे दुकान बंद करून ज्वेलर्स फरार असल्याची माहिती व्हायरल होऊ लागली. ज्या लोकांनी इथं गुंतवणूक केली होती आणि जे लोक आसपास राहत होते ते त्याच दिवशी आपले पैसे घेण्यास ज्वेलर्सच्या दुकानात पोहचले. त्यानंतर उपस्थित गुंतवणूकदारांना ज्वेलर्सकडून गुंतवणुकीच्या बदल्यात सोनं वाटण्यात आलं.

ग्राहकांची मदत

घाटकोपरचे भाजपचे आमदार पराग शहा यांनी यामध्ये ग्राहकांची मदत केली. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितलं की, ‘ग्राहकांची वाढती गर्दी पाहता ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी दागिन्यांचे दुकान पुन्हा बंद झाले, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. दुकानाबाहेर मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू लागली होती. शेवटी मालकानं इतर गुंतवणूक दारांनाही सोनं देण्याचं मान्य केलं.

पोंझी योजना

रसिकालाल संकलचंद ज्वेलर्स बेकायदेशीरपणे पोंझी योजना चालवत होते. काही गुंतवणूकदारांना दागिने मिळाले, तर काही गुंतवणूकदारांना काहीही मिळाले नाही. त्यानंतर गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) संपर्क साधला आणि ज्वेलर्सविरूद्ध तक्रार दाखल केली. दुसरीकडे ज्वेलर्सनीही व्हॉट्सअ‍ॅप संदेशांद्वारे अफवा पसरविल्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या मेसेजमुळं आपल्या व्यवसायावर मोठा नकारात्मक परिणाम झाला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.


हेही वाचा -

मध्य रेल्वेच्या कल्याण ते बदलापूर, आसनगावपर्यंत १५ डबा जलद लोकल

एसी लोकलला प्रदूषणाचा फटका, लोकलमध्ये धूळयुक्त हवेची शक्यता


पुढील बातमी
इतर बातम्या