मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत चालली आहे. वाझत्या संख्येमुळं धावत्या लोकमधून पडून काही प्रवाशांचा मृत्यू होतो, तर गर्दीमुळं प्रवाशांना धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागतो. मध्य रेल्वेवरील बदलापूर, अंबरनाथ, खोपोली, कसारा वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेत कल्याणच्या पुढे बदलापूर, आसनगाव, खोपोली, कसारापर्यंत १५ डबा जलद लोकल चालविण्याची शक्यता आहे. यासाठी मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना आर्थिक बळ लाभलं असून, हा प्रकल्प २ महिन्यांत मार्गी लागणार असल्याचं समजतं.
मध्य रेल्वेवर ठाणे ते खोपोली, कसारादरम्यान असलेल्या स्थानकातून गर्दीच्या वेळी प्रवास करणे कठीण झालं आहे. कल्याणपुढे खोपोली किंवा कसारापर्यंत जलद लोकल गाड्या धीम्या होतात. त्यामुळं या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुकर व जलद करण्यासाठी मध्य रेल्वेनं वर्षभरापूर्वी १५ डबा जलद लोकल चालवण्याचं नियोजन सुरू करण्यात आलं आहे.
याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसंच, हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडं देखील पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून आता या प्रकल्पाला मुंबई रेल्वे विकास महामंडळानंही (एमआरव्हीसी) निधी देण्यास तयारी दर्शवली आहे. या प्रकल्पाची किंमत ही ४९० कोटी रुपये आहे.
प्रकल्पाचं काम ३ टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कल्याण ते बदलापूर, दुसऱ्या टप्प्यात कल्याण ते आसनगाव आणि तिसऱ्या टप्प्यात बदलापूर ते खोपोली आणि आसनगाव ते कसारा असं काम करण्यात येणार आहे. या कामावेळी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणं, ओव्हरहेड वायरसह अन्य तांत्रिक कामं केली जाणार आहेत. १२ डबा लोकल गाड्यांना आणखी ३ डबे जोडून त्याचे पंधरा डब्यांत रूपांतर केलं जाणार आहे.
हेही वाचा -
एसी लोकलला प्रदूषणाचा फटका, लोकलमध्ये धूळयुक्त हवेची शक्यता
मुख्य धावपट्टीच्या दुरूस्तीच्या कामामुळं २४ विमानं रद्द