महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गड-किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा करणे, अंमली पदार्थाचे व्यसन करणे, किल्ल्यांवर गैरवर्तन केल्यास आता तात्पुरती शिक्षा न करता,थेट गुन्हा दाखल करण्याचा आदेशच गृह खात्याने पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. त्यामुळे मुंबईच्या वांद्रे, शिवडी, सायन, माहिम, कुलाबा,वरळी या किल्यांवर पोलिसांचा पहारा असणार आहे. कुणाकडूनही असा अपराध सिद्ध झाल्यास ६ महिन्यांचा सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचाः- Coronavirus Updates: मुंबईत गर्दीच्या ठिकाणी मिळणार सॅनिटायझर
फडणवीस सरकारने गड-किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर सोशल मिडिया आणि सर्व सामान्यांकडून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या, गड- किल्ले म्हणजे शौर्याची प्रतीके. मावळ्यांनी प्राणाची आहुती देऊन स्वराज्य टिकवले. अशी ठिकाणे पवित्रच असायला हवीत. परंतु नववर्ष स्वागत आणि वाढदिवस करण्यासाठी तरुण गडकिल्ल्यावर जातात. चक्क दारूच्या पार्ट्या करतात. अशांना शिवभक्तांनी चोप दिल्याचा व्हिडिओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत अशा पवित्र्य ठिकाणी पार्टी, अंमली पदार्थांचे सेवन, गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश गृहखात्याने पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत.
या कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर दारूबंदी कायदा आणि पुरातन वास्तूंचे नुकसान अशा दाेन्ही कायद्यांतील तरतुदीनुसार कारवाई या पुढे करण्यात येणार आहे. या कारवाईचा इशारा देणारा फलक प्रत्येक गड-किल्ल्याच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेशही गृह खात्याने दिलेले आहेत. त्यात गैरवर्तन म्हणजे काय? हे स्पष्ट करून शिक्षेची सूचना स्पष्टपणे मांडण्यास सांगितले. शहर आणि जिल्ह्यातील पाेलिस यंत्रणांना तातडीने या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून गड किल्यांवर जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी करवी. तसेच गड किल्यांवर गस्त आणि पोलिस पेट्रोलिंग कायम सुरू ठेवावे,असेही आदेशात म्हटले आहे. या आदेशामुळे गड-किल्ल्यांवर आता नशा आणणारे पदार्थ तर नेता येणार नाहीतच, परंतु असे पदार्थ जवळ बाळगणे हादेखील गुन्हाच ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे, माहिम, सायन, वरळी, कुलाबा, शिवडी या किल्यांवर आता स्थानिक पोलिसांचा पहारा राहणार आहे.
हेही वाचाः- मुंबईत असे कोणतेही पोलिस ठाणे नाही, ज्यात या दोघांवर गुन्हे दाखल नाहीत