लाच घेणाऱ्या पोलिसांवर थेट ‘बडतर्फ’ची कारवाई

नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच मुंबई पोलिस दलाला भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे मान खाली घालावी लागली. खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या एका मागोमाग एक आणखी काही घटना पुढे आल्या. यावर पोलिस आयुक्त सुबोध कुमार जैयसवाल यांनी लाच खोरांविरोधात कडक पाऊलं उचलली आहेत. यापुढे कुठल्याही अधिकाऱ्याला लाच स्विकारताना पकडल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई न करता त्याला थेट बडतर्फ करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

आयुक्तांकडून भ्रष्ट अधिकाऱ्यांना दम

भ्रष्टाचार कमी करून स्वच्छ प्रशासन देण्याचं सरकारचं ध्येयं असताना मुंबई पोलिस दलात एका मागोमाग एक चिरीमिरी घेणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी पकडले गेले. वर्षाची सुरूवातच मुंबई पोलिसांची वाईट झाल्यामुळे मुंबई पोलिस आयुक्त सुबोध कुमार जैयसवाल यांचा पारा चांगलाच वाढला आहे. मागील काही दिवसांपासून पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्याचबरोबर खात्यातून भष्ट्राचार मुक्तीसाठी त्यांनी यापुढे लाच घेणाऱ्यावर निलंबनाची कारवाई न करता थेट सेवेतून बडतर्फ केले जाणार असल्याचं सांगितलं. यापूर्वी लाच घेताना पकडलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं जायचं. लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यावरील गुन्हा सिद्ध झाल्यानंतरच त्यांच्यावर बडतर्फची कारवाई केली जायची. निलंबित अधिकाऱ्याला सेवेतील अर्धा पगारही मिळायचा. पण आता या नियमात बदल करण्यात आले आहेत. 

खबरदारी घेण्याचे ही आवाहन

खात्यातील भ्रष्टाचार मूळापासून दूर करण्यासाठी जैयसवाल यांनी लाच घेणाऱ्यांवर आता थेट बडतर्फची कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक भ्रष्ट पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. त्याच बरोबर पोलिस कर्मचाऱ्यांना काही महत्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नागरिकांशी सौजन्यतेनं बोला, मोबाइल किंवा प्रत्यक्ष बोलताना नियंत्रण ठेवा, कोणत्याही आमीषाला बळी पडू नका, अन्यथा परिणाम वाईट होतील असा सज्जड दमच पोलिस आयुक्तांनी दिला आहे. 


हेही वाचा

बारमध्ये शुटींग काढणे पडले महागात, ग्राहकाला नग्न करून बारमालकाने दिला चोप

वृत्तपत्राच्या ऑनलाइन साईटवर आक्षेपार्ह लिखाण करताय? मग हे वाचा


पुढील बातमी
इतर बातम्या