समीर वानखेडे प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री, तपास करण्यासाठी...

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे प्रकरणात मुंबई पोलिसांची देखील एन्ट्री झाली आहे. समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी चार अधिकाऱ्यांची नेमकणूक केली आहे. यासंदर्भातील आदेश मुंबई पोलिसांचे सह आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी बुधवारी जारी केलेत.

इंडिया टुडेनं पोलिसांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार हा तपासाचे नेतृत्व अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणजेच एसीपी दिलिप सावंत करतील.

या प्रकरणातील चौकशीसाठी नेमण्यात आलेले अधिकारी हे आझाद मैदान, कुलाबा पोलीस स्थानकातील प्रत्येकी एक तसंच मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील एक आणि अन्य एक अधिकारी सायबर सेलमधील असणार आहे.

समीर वानखेडेंविरोधात दाखल करण्यात आलेल्या चारही तक्रारींचा आम्ही एकत्रितपणे तपास करण्याचं ठरवलं आहे. या चारही तक्रारी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आल्यात, असं अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये कार्यरत असणाऱ्या समीर वानखेडेंविरोधात लाचखोरीच्या चार तक्रारी दाखल करण्यात आल्यात. प्रभाकर साईल, सुधा द्विवेदी, कनिश्क जैन आणि नितीन देखमुख यांनी या तक्रारी दाखल केल्या आहेत.

या चारपैकी प्रभाकर साईलनं केलेली तक्रार ही आर्यन खान प्रकरणातील आहे. प्रभाकर साईल हा या छाप्यातील साक्षीदार आहे. ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याला सोडून देण्यासाठी मध्यस्थांमार्फे शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप प्रभाकर साईलनं केलाय.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचंही साईलनं म्हटलंय.

दरम्यान, बुधवारी दक्षता पथकानं चार तास समीर यांची चौकशी केल्यानंतर काही महत्त्वपूर्ण कागदपत्रंही ताब्यात घेतली. वानखेडे यांच्या चौकशीसाठी ‘एनसीबी’चे दक्षता पथक दिल्लीहून मुंबईत आले आहे. पथकानं वानखेडे यांची चौकशी केली.


हेही वाचा

आम्हाला जाळून टाकू, मारून टाकू अशा धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर

खोदलेल्या खड्ड्यात चिमुरडे पडले, दोघांचा बुडून मृत्यू

पुढील बातमी
इतर बातम्या