मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयकडे द्या, ठाणे न्यायालयाचा एटीएसला आदेश

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास तात्काळ थांबण्याचे आदेश ठाणे सत्र न्यायालयाने महाराष्ट्र एटीएसला दिले आहेत. या प्रकरणातील सर्व कागदपत्रे तात्काळ एनआयएकडे सोपवण्यात यावीत, असाही आदेश न्यायालयाने एटीएसला दिला आहे. 

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हाती घेण्याचे निर्देश एनआयएनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आणले आहेत. मात्र एटीएसनं या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला नव्हता. तर एटीएसनं या प्रकरणात दोन आरोपींना अटकही केली आहे. महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हस्तांतरीत करत नसल्याची तक्रार एनआयएनं ठाणे सत्र न्यायालयात केली होती. एनआयएची ही तक्रार मान्य करत सत्र न्यायालयाने एटीएसला एटीएसला या प्रकरणाचा तपास थांबवण्याचे आदेश दिले आहेत. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पियो कार सापडली होती. ही कार मनसुख हिरेन यांची असल्याचं  समोर आलं होतं. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच हिरेन यांचा मृतदेह रेती बंदर येथील खाडीत सापडला होता. 

एनआयएनं अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. आता मनसुख हिरेन प्रकरण देखील एनआयएकडे आल्यामुळे या दोन्ही प्रकरणांवर सचिन वाझेंची चौकशी करण्याचा मार्ग एनआयएसाठी मोकळा झाला आहे. मंगळवारी एटीएसनं पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंनीच विनायक शिंदे या पॅरोलवरील आरोपीचा वापर करून गुन्ह्यामध्ये सहभाग ठेवल्याचं स्पष्ट केलं होतं. 

पुढील बातमी
इतर बातम्या