अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण, मुंबई विभागातून २ लाख २३ हजार प्रवेश निश्चित

मागील तीन महिन्यापासून सुरु असलेली अकरावी प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली आहे. यामध्ये मुंबई विभागातून यंदा २ लाख २३ हजार ६५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर ३६,३५८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून देखील प्रवेश निश्चित केलेले नाहीत. मात्र, आता या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी नसणार आहे.

१६ आणि १७ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणारी विशेष फेरी ही अंतिम फेरी असल्याची सूचना उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली होती. त्यामुळे अर्ज भरून देखील प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांना आता प्रवेश दिले जाणार नाहीत.  मुंबई विभागातील ३ लाख २० हजार ७५० जागांपैकी शेवटच्या फेरीनंतर ९७ हजार ९९ जागा रिक्त राहिल्या आहेत.

यंदा अकरावी प्रवेशामध्ये विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे पहायला मिळाला. १ लाख २३ हजार २९८ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश निश्चित केला आहे. तर ६८ हजार १६७ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेमध्ये आणि २२ हजार १२४ विद्यार्थ्यांनी कला शाखेत प्रवेश निश्चित केला आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया जरी लांबणीवर गेली असली तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग हे जानेवारी महिन्यापासूनच महाविद्यालयामध्ये सुरु करण्यात आले आहेत. तर राज्यभरात मुंबई वगळता इतर ठिकाणी प्रत्यक्ष वर्ग सुद्धा सुरु आहेत.


हेही वाचा -

कोरोना: मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांवर महापालिकेची नजर

राज्यात आठवड्यानंतर कडक निर्बंधांचे संकेत


पुढील बातमी
इतर बातम्या