मुंबई विद्यापीठाच्या दर्जाची मुख्यंमत्र्यांना काळजी!

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे जाहीर केलेल्या नॅशनल रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाने घोर निराशा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठांच्या कुलगुरूंना चांगलेच फैलावर घेतले आहे.

कुलगुरूंचे योगदान आवश्यक

अध्यापनाचा घसरलेला दर्जा, निकालातील गोंधळ, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात कमतरता या सर्व गोंधळामुळे मुंबई विद्यापीठाचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रखडलेल्या परीक्षांचे निकाल तसेच चालू शैक्षणिक वर्षाच्या परीक्षांचे निकाल वेळेवर लावण्याची सक्त ताकीद मुख्यमंत्र्यांद्वारे देण्यात आली आहे. प्रत्येक विद्यापीठातील कुलगुरू हा ज्ञाननिर्मिती करणारा असतो, त्यामुळे कुलगुरूंनी विद्यापीठासाठी अधिक चांगले योगदान द्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शैक्षणिक प्रश्नांसाठी कृती दल

विद्यार्थ्यांचे मानांकन वाढण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाने अभ्यासपूर्ण आराखडा तयार करावा, तसेच शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी कृती दलाची निर्मिती करावी, असेही या बैठकीदरम्यान सांगण्यात आले. प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी नियोजन करण्यात यावे, असे स्पष्ट आदेशही त्यांनी कुलगुरूंना दिले आहेत.

शैक्षणिक प्रगतीसाठी कॉलेजला स्वायत्तता

येणाऱ्या काही काळात उत्तम शैक्षणिक प्रगती करणाऱ्या कॉलेजेसना स्वायत्तता देण्यात येईल, तसेच, स्वायत्तता दिल्यानंतर या कॉलेजांचा आढावा उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ठेवावा अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.


हेही वाचा

मुंबई विद्यापीठाचा नवा कारनामा, ३० परीक्षा तब्बल महिनाभर पुढे ढकलल्या!

पुढील बातमी
इतर बातम्या