अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली असून  सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. कोरोनाच्या संकटामुळे अभ्यासात अडचणी निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही दिलसादायक बातमी आहे.

यासंदर्भात उदय सामंत म्हणाले, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीला विज्ञान विषयांमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र) किमान ५० टक्के गुण मिळणे आणि प्रवेश पात्रता परीक्षा (CET) देणं आवश्यक होतं. आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीला ४५ टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत. तर राखीव गटांसाठी ४० टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत.

हेही वाचा - खंडित वीज पुरवठ्यामुळे मुंबई विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पात्रतेच्या निकषांमध्ये यंदा बदल करण्यात आल्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. बारावीचे पात्रता गुण ५ टक्क्यांनी कमी केले आहेत. याचा फायदा असंख्य विद्यार्थ्यांना होणार आहे, असंही उदय सामंत म्हणाले.

या निर्णयामुळे सीईटी परीक्षेमध्ये किमान एक गुण आणि बारावीला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४५ टक्के गुण व मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४०% असतील तर ते आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहेत.

हेही वाचा- आयडॉलच्या हेल्पलाइनवर विद्यार्थ्यांच्या प्रचंड तक्रारी
पुढील बातमी
इतर बातम्या