यंदाही प्रवेशाचा गोंधळ होणार?

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

मुंबई विद्यापीठ संलग्नित अल्पसंख्याक महाविद्यालयातील प्रवेशाचा मागासवर्गीय कोटा रद्द करण्यासाठी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या मेरीट यादीला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. परंतु आता आठवडा उलटत आला तरी याबाबत अंतिम निर्णय न झाल्यानं यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ होण्याची चिन्हं दिसत आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिका

येत्या काही दिवसांत पदवी अभ्यासक्रमाची दुसरी मेरीट लिस्ट जाहीर झाली नाही, तर परीक्षेदरम्यान पुन्हा गोंधळ होण्याची शक्यता विद्यार्थी-पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी व पालकांचं लक्ष सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेकडे लागलं आहे.

प्रवेशाचा प्रश्न गंभीर

मुंबई विद्यापीठ संलग्नित अल्पसंख्याक महाविद्यालयंमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी राखीव कोटा ठेवण्यात येत होता. मात्र डिसेंबर २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हा कोटा रदद् करण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयानुसार मुंबई विद्यापीठ संलग्नित अल्पसंख्याक महाविद्यालयांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंबलबजावणी करण्याचं ठरवलं.

प्रवेश लांबणीवर

मात्र या निर्णयानंतर अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांची दारं कायमची बंद झाली आहे. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थी संघटनांनी याविरोधात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे दाद मागितली होती.

त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली असता प्रवेशासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे जवळपास सर्वच महाविद्यालयातील प्रवेश जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्य़ंत लांबणीवर पडण्याची शक्यता प्राचार्यांकडून वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा-

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : विद्यापीठानं घेतली 'त्या' अपंग विद्यार्थ्याची दखल

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर


पुढील बातमी
इतर बातम्या