२०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी गुरूवारी, ५ जुलै रोजी जाहीर करण्यात आली आहे. गुणवत्ता यादीत एकूण १ लाख २० हजार ५६८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला अाहे. तर यातील ३५ हजार ७८७ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचं महाविद्यालय मिळालं अाहे.
तसंच यंदा वाणिज्य (कॉमर्स) शाखेतील तब्बल १७ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालय मिळालं असून अनेक नामांकित महाविद्यालयांचा कट अाॅफ नव्वदी पार असल्याचं पहायला मिळत आहे.
यंदा मुंबई विभागातून २ लाख ३१ हजार १४ विद्यार्थ्यांची नावं सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये जाहीर करण्यात आली अाहेत. यातील ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १६ हजार ४६२ एवढी आहे. त्यामुळं यंदा नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशाचा मार्ग खडतर होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. विद्यार्थ्यांना ६ ते ९ जुलैदरम्यान आपला प्रवेश निश्चित करायचा अाहे. पहिल्या पसंतीक्रमानुसार ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, त्यांना त्याच महाविद्यालयात प्रवेश घेणं बंधनकारक आहे. दरम्यान, यांसदर्भातील अधिक माहिती शिक्षण उपसंचालक विभागाकडून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची सामान्य गुणवत्ता यादी शुक्रवारी २८ जूनला जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये १०० टक्के गुण मिळालेले चार विद्यार्थी असून २ हजार ७९१ विद्यार्थी ९५ टक्के गुण मिळवलेले आहेत. तर ९० ते ९४.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजार ६६७ इतकी आहे. तसंच सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी जास्त असल्यानं मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
हेही वाचा -
बीएससी सेमिस्टर ६चा निकाल जाहीर
मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : विद्यापीठानं घेतली 'त्या' अपंग विद्यार्थ्याची दखल