२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात नामांकित कॉलेजांमधील अकरावी प्रवेशाचा मार्ग खडतर होणार आहे. कारण ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची सामान्य गुणवत्ता यादीतील संख्या १६ हजार ४६२ पर्यंत पोहचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या संख्येत सुमारे ३ हजारानं वाढ झाली आहे. यामुळे यंदा नामांकित कॉलेजांमधील प्रवेश नव्वदीतच रेंगाळणार असल्याचं चित्र दिसत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये रंगणार स्पर्धा
अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची सामान्य गुणवत्ता यादी शुक्रवारी २८ जूनला संध्याकाळी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये १०० टक्के गुण मिळालेले चार विद्यार्थी असून २ हजार ७९१ विद्यार्थी ९५ टक्के गुण मिळवलेले आहेत. तर ९० ते ९४.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यर्थ्यांची संख्या १३ हजार ६६७ इतकी आहे. यामुळे प्रवेशाची खरी स्पर्धा या विद्यार्थ्यांमध्ये रंगणार आहे.
या गुणवत्ता यादीमध्ये काही चुका असल्यास त्याची दुरुस्ती ३ जुलैपर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयात करणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर पहिली गुणवत्ता यादी ५ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
आर्ट्स शाखेला १५० विद्यार्थ्यांची पसंती
या यादीत १०० टक्के गुण प्राप्त झालेल्या चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांनी सायन्स, एक कॉर्मस आणि एकाने आर्ट्स शाखेत अर्ज केला आहे. ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या १५० विद्यार्थ्यांनी आर्ट्स शाखेला पसंती दर्शवली आहे. दरम्यान या यादीमुळे आर्ट्स आणि कॉमर्स शाखेकड विद्यर्थ्यांचा कल वाढत असून यंदा या दोन्ही शाखांचा कटऑफ नक्कीच वाढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
कॉमर्ससाठी सर्वाधिक अर्ज
अकरावी प्रवेशासाठी सुमारे दोन लाख ९८ हजार ४०५ जागांकरिता मुंबई विभागातून दोन लाख ३१ हजार ३९१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये कॉमर्स शाखेसाठी सर्वाधिक १ लाख ४३ हजार ५५८ अर्ज आले असून त्या खालोखाल सायन्ससाठी ६६ हजार ९७६, तर आर्ट्ससाठी १९ हजार ४५९ अर्ज दाखल झाले आहेत.
हेही वाचा -
बायफोकल प्रवेशाची दुसरी यादी जाहीर
अकरावी प्रवेशासाठी अडीच लाख अर्ज