'द काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन' (CISCE) बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आयसीएसई (ICSE) आणि बारावी आयएससी (ISC) परीक्षेचे निकाल सोमवारी १४ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आले.
२६ फेब्रुवारी ते २८ मार्च यादरम्यान दहावीची तर ७ फेब्रुवारी ते २ एप्रिल दरम्यान बारावीची परीक्षा झाली होती. या परीक्षेला देशभरातील एकूण २.५ लाख विद्यार्थी बसले होते.
बारावीच्या परीक्षेत मुंबईच्या पोदार हायस्कूलचा अभिज्ञान चक्रवर्ती आणि तानसा शाह देशात पहिले आले, तर दहावीत सेंट मेरी हायस्कूल, कोपरखैरणेचा स्वयं दास देशात पहिला आला.
बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी कमीत कमी ३३ गुण आवश्यक आहेत. याआधी पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना ३५ गुण आवश्यक असायचे. १२ वीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी कमीत कमी ४० गुण आवश्यक असायचे ते आता ३५ इतके करण्यात आले असून मॉडरेशन आणि ग्रेस गुणांसाठी बोर्डाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या समितीशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
विद्यार्थ्यांना दहावी-बारावीचा निकाल www.cisce.org किंवा www.results.cisce.org या वेबसाईटवर पाहता येणार आहे. तसेच ०९२४८०८२८८३ या क्रमांकावर विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक पाठवल्यानंतरही तुम्हाला एसएमएसद्वारे निकाल मिळू शकणार आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सात दिवसांमध्ये २१ मे पर्यंत पुर्नतपासणीसाठी अर्ज करता येणार आहे.
*विद्यार्थ्यांना हा रिझल्ट डाऊनलोडही करता येईल
हेही वाचा -