व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने एक जून रोजी जाहीर केलेलं 'आयटीआय' प्रवेशाचं वेळापत्रक अचानक रद्द केलं आहे. दहावीच्या निकाल लागल्यानंतर आयटीआयसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन, दहावीचा निकाल लागण्यापूर्वी इतर विद्यार्थ्यांचे (दहावी फ्रेशर्स वगळता) प्रवेश अर्ज सादर व्हावे, यासाठी आयटीआयने १ जून रोजीच प्रवेशअर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र दहावीच्या गुणपत्रिका नसल्यानं हा अभिनव प्रयोग फसला. त्यामुळे पूर्ण प्रवेशप्रक्रिया वेळापत्रक रद्द करण्याची वेळ 'आयटीआय'वर आली आहे.
दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातंर्गत राज्यातील सर्व सरकारी तसेच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील ऑनलाइन प्रवेशाला सुरुवात करण्यात आली होती. त्याचसोबत सर्व फेऱ्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं होतं.
दहावीचा निकाल लागल्यानंतर आयटीआयच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरताना दहावी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत स्वीकारली न जाणे आणि मिळालेले गुण न दिसणे अशा अनेक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावं लागत आहे.
तसंच ऑनलाइन जाहीर झालेल्या निकालांमध्ये एनसीसी, स्काऊट गाइड आणि तंत्रज्ञान विषयांचे गुण दाखवत नसल्यानं या गुणपत्रिकांचा आयटीआय प्रवेशासाठी काहीही उपयोग होत नसल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकेची वाट पाहावी लागणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना संबधित शाळांमधून २२ जून रोजी मूळ गुणपत्रिका मिळणार आहे. त्यानंतरच सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.
हेही वाचा -
दहावीच्या परीक्षेत मुंबईतील ८१६ शाळांना १०० टक्के