राज्य शिक्षण मंडळाचा दहावी बोर्डाचा निकाल ८ जून रोजी १ च्या सुमारास जाहीर करण्यात आला असून यात मुंबईच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात मुंबई विभागातील जवळपास ३६७९ शाळांपैकी ८१६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, १२७० शाळांचा निकाल ९० ते ९९ टक्के लागला आहे.
यंदा मुंबई विभागाचा दहावीचा निकाल ९०.४१ टक्के इतका लागला आहे. गेल्यावर्षी मुंबईचा निकाल ९०.०९ टक्के लागला होता. त्यामुळे मुंबई विभागाच्या टक्केवारीत निश्चितच सुधारणा झाली आहे. मुंबईतील ३ लाख, ३९ हजार, ८९९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून त्यातील ३ लाख ०६ हजार १५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
श्रुतिका जगदीश महाजन या डोंबिवलीतील चंद्रकांत पाटकर शाळेतील विद्यार्थीनीला १०० टक्के गुण मिळाले आहेत. मला दहावीत ९५ ते ९८ टक्के मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र मला १०० टक्के मिळाले आहेत यावर माझा अजूनही विश्वास बसत नसल्याचं तिने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.
दहावीच्या अभ्यासाठी तिने वर्षाच्या सुरूवातीला अभ्यासाच वेळापत्रक बनवलं होत. त्यानुसार दिवसातून किमान ३ ते ४ तास मी अभ्यास करत असे, तसंच माझ गणित विषय थोडा कच्चा असल्यान मी त्याचा नेहमी १ तास अभ्यास करायचे. मी अभ्यास सांभाळून भरतनाट्यमच्या क्लासलाही जात होते. मला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची इच्छा आहे.
- श्रुतिका जगदीश महाजन, विद्यार्थिनी
तर, सानिका संजय गायकवाड या डोंबिवलीतील विद्यार्थीनीला दहावीच्या परीक्षेत ९९.८० गुण मिळाले असून ती विद्या निकेतन शाळेची विद्यार्थिनी आहे. दहावीच्या सुरूवातीपासूनच मला ९५ टक्क्यापेक्षा जास्त टक्के मिळवण्याच इच्छा असून माझी इच्छा पूर्ण झाली आहे. दहावीच्या शैक्षणिक वर्षापासूनच मी अभ्यासासह, वेळ आणि पेपर कशा प्रकारे नीट सोडवता येईल, यावर लक्ष केंद्रीत केल होतं. मला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची इच्छा असून मला भविष्यात इंजिनिअर व्हायचं आहे. माझ्या या यशाचं श्रेय मी माझे आई-वडिल, शाळा यांना देईन, कारण त्यांच्या मेहनतीमुळे मला इतक चांगले गुण मिळाले, अशी प्रतिक्रिया सानिकाने दिली.
दहावीच्या परीक्षेतील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागांच्या निकालात मुंबईच्या विद्यार्थीर्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. राज्यात एकूण १६ लाख ३६ हजार २५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १४ लाख ५६ हजार २०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली असून ७ लाख ४२ हजार ५९३ विद्यार्थीनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यातील ६ लाख ७६ हजार ९१६ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून त्यांचा निकाल ९१.४६ टक्के इतका लागला आहे.
तर, मुलांमध्ये ९ लाख ०७ हजार ९०६ विद्यार्थ्यांपैकी ७ लाख ८१ हजार ९३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ८६.५१ टक्के इतकी आहे.
हेही वाचा-
दहावीचा निकाल जाहीर, इथं पाहा निकाल