मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे उडालेल्या निकाल गोंधळाचा सर्वाधिक फटका लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. या विद्यार्थ्यांमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. ४५ दिवसांचा कालावधी उलटूनही या विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला नाही, त्यातच पुढील सेमिस्टर आणि एटी/केटी परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाकडून जाहीर झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे.
या प्रकाराचा निषेध नोंदवत 'स्टुडंट लॉ काऊन्सिल'ने ७ एप्रिलपर्यंत मुंबई विद्यापीठाने निकाल जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. विद्यापीठाने निकाल वेळेत जाहीर न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे एलएलबीच्या विद्यार्थ्यांना आधीच्या निकालासाठी बराच वेळ ताटकळत बसावं लागलं होतं. निकालांची डेडलाईन संपून १०० दिवस उलटूनही निकाल न लागल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत.
त्यातच पुढील सेमिस्टरच्या परीक्षांची तारीख विद्यापीठाने जाहीर केली आहे. त्यामुळे या परीक्षांचे पुनर्मूल्यांकन कधी करणार? असा प्रश्न 'स्टुडंट लॉ काऊन्सिल'चे अध्यक्ष सचिन पवार यांनी उपस्थित केला आहे.
विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारभारामुळे आधीच विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लगत असल्याने प्र. कुलगुरूंनी यात लक्ष घालून निकाल लवकर लावावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिक्षणमंत्री विद्यापीठावर नियंत्रण ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले अाहेत. ७ एप्रिलपर्यंत निकाल न लावल्यास आम्ही राज्यपालांची भेट घेणार असल्याचं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा-
आठवड्याभरात पुनर्मूल्यांकनाचे निकाल होणार जाहीर, प्रभारी कुलगुरूंची ग्वाही
विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनातून कमावले ४ कोटी ८३ लाख, निकाल अजूनही प्रलंबित