‘वी कॅन डू इट ऑफलाईन एक्झाम’, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवी मोहीम

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं आवश्यक आहे. यासाठी शिक्षक प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावं. सर्वांनी एकत्र येऊन शासनासोबत ‘वी कॅन डू ईट ऑफलाईन एक्झाम’ ही मोहीम यशस्वीपणे राबवून विद्यार्थ्यांची सकारात्मक मानसिकता तयार करण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं.

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राज्यभर समान स्तरावर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी सज्ज होताना (‘वी कॅन डू ईट ऑफलाईन एक्झाम’) ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासंदर्भातील मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

चर्नी रोड येथील बालभवन इथं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परिक्षांबाबत बैठकीचं गुरूवारी आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, एसएससी मंडळाचे प्रकल्प समन्वयक दिनकर पाटील, एसईआरटीचे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक विकास गरड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा- दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार- वर्षा गायकवाड

यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, विद्यार्थ्यांची सुरक्षा, शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि परिक्षेच्या पूर्वतयारीस वेळ मिळावा या सर्व बाबींचा विचार करून परिक्षेचं वेळापत्रक ठरविण्यात आलं आहे. वेळापत्रकाबाबत आणखी काही सूचना असतील तर त्या सादर कराव्यात. त्याबाबत सल्लागार समितीशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. प्रॅक्टीकल परीक्षा, जनरल सादर करणं याबाबत संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एकसारखा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी दिली. 

सह्याद्री वाहिनीवर शासनामार्फत व्याख्यानमाला सुरू असून, परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाचे प्रश्न, स्वाध्याय यासाठीही कार्यक्रम घेतले जातील, असंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना सामान्यत: पडणाऱ्या प्रश्नांबाबत वेबसाईटवर लवकरच ‘एफएक्यु’ (FAQ) देण्यात येणार आहेत. ज्या निवासी शाळा बंद आहेत, त्या शाळेतील फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि परीक्षा देण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असंही मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितलं.

(maharashtra education minister varsha gaikwad starts new movement on offline ssc and hsc exam)

हेही वाचा- शिक्षक पात्रता परीक्षेवर लवकरच निर्णय
पुढील बातमी
इतर बातम्या