आयडॉल प्रवेशाचा गोंधळ सुरूच

मुंबई विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अॅप आणलं असतानाच दूर आणि मुक्त शिक्षण संस्था (आयडॉल) मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेक विद्यर्थ्याना मुंबई विद्यापीठाच्या कालिना केंद्र गाठावं लागत आहे. तसंच येत्या ३१ ऑगस्टला प्रवेशाची अंतिम मुदत असल्यानं विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्यासाठी धावपळ सुरू आहे.

विद्यार्थी गोंधळात

डिजिटल म्हणवणाऱ्या मुंबई विद्यापीठात सर्व काही ऑनलाइन सुरू असताना ऑयडॉल प्रवेशासाठी मात्र विद्यार्थ्यांना संकुलात येऊन रांगेत उभं राहावं लागत आहे. प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केला असता कोणाचा पीआरएन नंबर आला नाही, तर कुणी पैसे भरले तर त्याची पावतीच आली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आयडॉलमध्ये बरीच गर्दी केली आहे.

एकवीसाव्या शतकात डिजिटल इंडियाचे नारे सुरू असताना विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जर अशाप्रकारे विद्यापीठात खेटा घालाव्या लागत असतील तर ते चुकीचं आहे. विद्यापीठानं तातडीनं याबाबतची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. तसंच विद्यापीठाच्या आयडॉल संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना सोयीस्कर अशी प्रक्रिया तयार करावी.

- सुप्रिया कारंडे, सिनेट सदस्य

विद्यापीठाने आयडॉलमध्ये चार कक्ष सुरू केले असून त्याबाबतच्या अडचणी सोडवता येत आहे. विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन तेथे केलं जात असल्यानं विद्यर्थ्यांनी या ठिकाणी संपर्क साधावा.

- विनोद मळाळे, उपकुलसचिव, मुंबई विद्यापीठ


हेही वाचा -

विद्यापीठाचे निकाल अजूनही रखडलेलेच

पुढील बातमी
इतर बातम्या