राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा नुकतीच संपली. त्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही अॅडमिशनसाठीची लगबग सुरू झाली आहे. यावर्षीची अकरावी प्रवेशप्रक्रिया नेमकी कशी असणार? त्यात कोणते बदल असणार? यांसारखे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात उपस्थित झाले आहेत. या संदर्भात नुकतेच 'मुंबई लाइव्ह'ने विभागीय शिक्षण कार्यालयाशी संवाद साधला.
यंदाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत बरेच बदल करण्यात आले असून लवकरच पहिला टप्पा सुरू करण्यात येणार आहे. त्याशिवाय यावर्षी बायोफोकल म्हणजेच कॉम्पुटर सायन्स, इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिस, बँकिंग, ऑफिस मॅनेजमेंट यांसारख्या शाखांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष ऑनलाईन फेरी होणार आहे. या विशेष फेरीनंतरच कॉमर्स, सायन्स, आर्ट्स व एमसीव्हीसी (एचएसव्हीसी) या शाखांच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया होणार आहेत.
दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेशपुस्तिका घेणे बंधनकारक आहे. या प्रवेशपुस्तिकेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा विशिष्ट लॉगइन आयडी व पासवर्ड दिला गेला आहे. त्याशिवाय त्यात विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी काही सूचनाही दिलेल्या आहेत. यावर्षीपासून कॉलेजच्या नावांची यादी पुस्तकात प्रसिद्ध करण्यात येणार नसून, ती यादी तुम्हाला आता http://mumbai.11thadmission.net या वेबसाईटवरच मिळणार आहे. विशेष म्हणजे यामुळे १५० ते २०० पाने असणारी ही माहिती पुस्तिका या वर्षी अवघ्या ४० पानांची असणार आहे. या पुस्तिकेची किंमत मात्र २५० रूपये इतकीच राहणार आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ३९ मार्गदर्शन केंद्रही सुरू करण्यात आली आहेत. ऑनलाईन प्रवेशासंदर्भात कोणत्याही अडचणी, त्रुटी किंवा इतर प्रक्रियेबाबत विद्यार्थी या ३९ माहिती केंद्रांवर आक्षेप नोंदवू शकतात. त्याशिवाय शिक्षण निरीक्षक आणि शिक्षण उपसंचालक विभागाकडेही तक्रार करता येणार आहे.
मार्च २०१८ शालांत परीक्षेत पहिल्यांदा बसून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी
http://mumbai.11thadmission.net या वेबसाईटवर लॉगइन आयडी व पासवर्ड टाका.
त्यानंतर तुमचा दहावीच्या परिक्षेचा बैठक क्रमांक टाकल्यानंतर संपूर्ण माहिती प्रवेश अर्जामध्ये आपोआपच भरली जाईल.
त्यानंतर विद्यार्थ्याला हव्या असलेल्या शाखेवर क्लिक करून त्यांनी हव्या असलेल्या कॉलेजची नावे भरायची आहेत. कमीत कमी १ व जास्तीत जास्त १० कॉलेजची नावे या प्रवेशअर्जामध्ये भरता येणार आहेत. गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही कोणत्याही पद्घतीने ऑफलाईन प्रवेश स्विकारण्यात येणार नाहीत. तसेच शाखा व पसंतीक्रम बदलण्याची मुभाही विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.
हेही वाचा