शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत समाजातील दुर्बल व वंचित घटकांना मोफत शिक्षण देण्यात येत असून सर्व खासगी शाळांना विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखून ठेवणं बंधनकारक आहे. यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला मंगळवारी ५ मार्चपासून सुरूवात करण्यात आली आहे. २२ मार्चपर्यंत आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
मोफत व सक्तीच्या बालशिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखून ठेवणं बंधनकारक आहे. त्यानुसार दरवर्षी दाखल झालेल्या अर्जांची ऑनलाईन लॉटरीद्वारे निवड करण्यात येते. त्यानंतर आरटीईद्वारे या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची फी केंद्र व राज्य सरकारमार्फत संबंधित शाळांना दिली जाते.
गेल्यावर्षी मुंबईत आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी ८ हजार ३७४ जागा असूनही फक्त ३ हजार २३३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. आरटीई प्रवेश प्रक्रियेविषयी पालकांना माहिती नसल्याने अनेक विद्यार्थी शाळा प्रवेशापासून वंचित राहतात. यामुळे युवासेना व भारतीय शालेय पालक संघाच्या वतीने शिवसेनेच्या विविध शाखांमध्ये आरटीई प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्याशिवाय शिवसेनेच्या शाखेवर ऑनलाईन अर्ज भरण्यास पालकांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
https://rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाईटवर पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार असून अॅपवर अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना नर्सरीसाठी ३ वर्ष पूर्ण, ज्युनिअर केजीसाठी ४ वर्षे पूर्ण असणे गरजेचं असणार आहे. तसंच इयत्ता पहिलीसाठी ५ वर्षे ८ महिने पूर्ण असणे गरजेचं असणार आहे. आरटीई प्रवेशासाठी निवासी दाखला, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, दिव्यांगांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, विधवा महिला, घटस्फोटीत प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
हेही वाचा -
आयपीएलमध्ये कॅच घ्या, SUV कार जिंका!
पालिका क्षेत्रात २११ बोगस शाळा