ऑल द बेस्ट! शुक्रवारपासून दहावीची परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला शुक्रवारी १ मार्चपासून सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरूवात होणार आहे. या परीक्षेला मुंबई विभागातून ३ लाख ८३ हजार ३२० विद्यार्थी परीक्षेला बसणार असून मुंबई विभागात ९९९ परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. बारावीच्या परीक्षेप्रमाणे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीट देण्यात आले आहे.

१०० गुणांचा पेपर

गेल्या कित्येक वर्षांपासून दहावीसाठी ८० गुणांची लेखी तर २० गुणांची तोंडी परीक्षा असे स्वरूप होते. मात्र यंदा शिक्षण विभागाकडून दहावीच्या अभ्यासक्रम बदलण्यात आला असून प्रश्नपत्रिकेचे स्वरूपही बदलण्यात आले आहे. बदललेल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार मराठी, हिंदी, इंग्रजी, सोशल सायन्सचे पेपर १०० गुणांचे असणार आहेत. बदलेला अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, गुणांचे वर्गीकरण या सर्व गोष्टींमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मुंबई विभागातून सर्वाधिक विद्यार्थी

यंदा मुंबई विभागातून सर्वाधिक ३ लाख ८३ हजार ३२० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यात ठाणे जिल्ह्यातून १ लाख २१ हजार ४४१ विद्यार्थी, पालघर ६७ हजार ७६२, रायगड ३९ हजार ४३४ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तसेच मुंबईतील पश्चिम विभागातून सर्वाधिक ६७ हजार २८४ विद्यार्थी, मुंबई उत्तर विभागातून ५२ हजार २४७ विद्यार्थी, मुंबई दक्षिण विभागातून ३५ हजार १५२ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार  आहेत.मुंबई विभागातून ९९९ परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार असून या केंद्रावर ९९९ केंद्र संचालकांसोबतच ७५ परीरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.


हेही वाचा -

शिक्षकांसाठी खूशखबर : १०,००१ जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध

मुक्ता म्हणतेय, 'उगीचच काय भांडायचंय?'


पुढील बातमी
इतर बातम्या