'स्वराज्यरक्षक संभाजी'मध्ये शिवपर्वाची अखेर!

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी दु:खद घटना 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत पहायला मिळणार आहे. ही घटना पाहून सह्याद्रीही जिथे गहिवरला तिथे सर्वसामान्य रयतेच्या मनाचे काय हाल झाले असतील याची कल्पनाही न केलेली बरी. हीच घटना आता 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

याअाधी निर्वाणाचा प्रसंग नाही

भारताच्या इतिहासात ज्यांनी सुवर्णकाळ निर्माण केला ते शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज.. त्यांचं कार्यकर्तृत्व बघताना इतिहास रोमांचित झाला आणि त्यांच्या देहावसानाने हाच इतिहास गहिवरला, काळाचा कठोर स्वरही त्याक्षणी कातर झाला. म्हणूनच आजवर छत्रपती शिवाजी महाराजांवर निर्माण झालेल्या कोणत्याही नाटकात, मालिकेत, चित्रपटात शिवाजी महाराजांच्या निर्वाणाचा प्रसंग दाखवण्यात आलेला नाही.

निर्वाणासंबंधी मतभेद

शिवाजी महाराजांच्या निर्वाणासंबंधी आजही अनेक मतभेद, वाद-विवाद प्रचलित आहेत. त्यासंबधी अनेक गैरसमज आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला ज्या प्रसंगाने शोकाकुल केलं तो प्रसंग झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. म्हणूनच कोणत्याही नाटक, चित्रपट, आणि मालिकेतून दाखवण्यात न आलेला शिवाजी महाराजांच्या निधनाचा प्रसंग 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून दाखवण्यात येणार आहे.

निर्वाणाबाबत गुप्तता

शिवाजी महाराजांच्या निर्वाणाबाबत त्याकाळी प्रचंड गुप्तता पाळली गेली होती. ज्येष्ठ पुत्र असूनही युवराज संभाजी राजांना अंत्यविधीच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. या सगळ्या घटनेनंतर संभाजी राजांच्या आयुष्याला काय वळण मिळतं? रायगडावरच्या राजकारण कोणाच्या हातात जातं? अनाजी दत्तो, सोयराबाई आणि कारभारी मिळून कोणते नवे मनसुबे रचतात? औरंगजेबाच्या वाढत्या आक्रमणांना संभाजी राजे कसं थोपवतात? इतिहासाच्या हृदयात दडलेल्या या रहस्यमय गोष्टी 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत.


हेही वाचा - 

EXCLUSIVE : तावडे पिता-पुत्राचा अजब योगायोग!

'नशीबवान' भाऊचा 'ब्लडी फूल...' परफॉर्मन्स


पुढील बातमी
इतर बातम्या