मराठमोळ्या सौंदर्याला सहजसुंदर अभिनयाची जोड देत एके काळी हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत गटबाजी फोफावल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. ‘एक होतं पाणी’ या आगामी मराठी चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी हा आरोप केला. महामंडळाच्या संचालिका या नात्यानं त्या ‘एक होतं पाणी’ या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
मराठी चित्रपटसृष्टीलाही गटबाजीची कीड लागली असून, हे लक्षण इंडस्ट्रीसाठी घातक आहे. या गटबाजीमुळं बऱ्याच कलाकारांना कामं मिळत नाही. जो तो आपल्यापल्या गटातील कलाकारांना घेऊन चित्रपट बनवतो. हे चुकीचं आहे. मराठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे आज खूप सदस्य आहेत, पण त्या सर्वांना चित्रपटात कामं मिळतातच असं नाही. कित्येकांना संधीअभावी खितपत पडावं लागतं. हे कुठंतरी थांबायला हवं. जे महामंडळाचे सदस्य आहेत, ज्यांच्याकडं अधिकृत ओळखपत्र आहे त्यांना मराठी निर्मात्यांनी लहानसहान भूमिकांमध्ये तरी संधी द्यायला हवी. त्यामुळं चित्रपटसृष्टीतील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, असं मत वर्षा यांनी व्यक्त केलं.
पूर्वीच्या काळी केवळ विनोदी आणि मसालेदार चित्रपट बनायचे, पण आजचे मेकर्सही अत्यंत हुषार असून, प्रेक्षकही चाणाक्ष आहेत. त्यामुळंच मराठीत वास्तववादी विषयांवर आधारित चित्रपट बनत आहेत. ज्यांचं प्रेक्षकही कौतुक करत आहेत. ‘एक होतं पाणी’ हा चित्रपट पाण्याच्या भयंकर परिस्थितीची जाणीव करून देणारा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर यात काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केल्याचं जाणवलं. त्यासोबतच चित्रपटातील गाणीही चांगली आहेत. पाणी हे जीवन आहे. ते जपून वापरलं तर ही समस्या बऱ्याच अंशी कमी होईल असं वर्षा म्हणाल्या.
‘एक होता राजा, एक होती राणी. उद्या म्हणू नका, एक होतं पाणी’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटातून पाण्याची दाहकता मांडण्यात आली आहे. समजा पाणीच नसेल तर काय होईल? या संकल्पनेवर आधारीत असलेल्या या चित्रपटाचं लेखन आशिष निनगुरकरनं केलं आहे. आशिषनंच गीतलेखन केलं असून, त्यांना विकास जोशी यांनी संगीत दिलं आहे. ऋषिकेश रानडे, आनंदी जोशी, रोहित राऊत व विकास जोशी यांनी गाणी गायली आहेत. व्ही. पी. वर्ल्ड मुव्हीज आणि न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज यांची निर्मिती असलेल्या "एक होतं पाणी" या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहन सातघरेनं केलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील डोंगरगण, वांबोरी, ब्राम्हणी, टाकळीमिया व राहुरी येथे चित्रीत झालेल्या चित्रपटाचं छायांकन योगेश अंधारे यांनी केलं आहे. या चित्रपटात हंसराज जगताप, श्रीया मस्तेकर, अनंत जोग, चैत्रा भुजबळ, गणेश मयेकर, यतीन कारेकर, रणजित जोग, जयराज नायर, दिपज्योती नाईक, त्रिशा पाटील, आशिष निनगुरकर, उपेंद्र दाते, आनंद वाघ, रणजित कांबळे, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, डॉ. राजू पाटोदकर व राधाकृष्ण कराळे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. डॉ. प्रविण भुजबळ व विजय तिवारी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हेही वाचा-
EXCLUSIVE : मालवणी ‘शेवंता’ बनली भोजपुरी ‘भाभी’
राणी लक्ष्मीबाईंच्या महालात स्पृहा