मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये रंगभूषाकार म्हणून स्वतःचा ठसा उमटवलेला रंगभूषाकार संतोष गिलबिले यानं बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. बहुचर्चित 'मणिकर्णिका' या चित्रपटासाठी त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांना मेकअप करण्याचं काम केलं आहे.
चित्रपट किंवा रंगभूषेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना संतोषनं प्रचंड मेहनतीच्या बळावर स्वत:ला सिद्ध करत इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे. रंगभूषा म्हणजे काय हे माहीत नसण्यापासून हिंदीत रंगभूषाकार म्हणून मानानं काम करण्यापर्यंत संतोषनं घेतलेली गरूडझेप कौतुकास्पद आहे. संतोषच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई-वडिलांची भाजीची गाडी होती. त्या गाडीवर भाजी विकण्यासाठी संतोष बसायचा. तशाही परिस्थितीत त्यानं आपलं शिक्षण सुरू ठेवलं.
महाविद्यालयीन शिक्षणासोबतच संतोषनं कला मंडळातही प्रवेश घेतला. सुरुवातीला एकांकिकांमधून छोट्या भूमिका केल्या. अल्पावधीतच अभिनय हा आपला प्रांत नसल्याचं त्याला कळून चुकलं. पण तोपर्यंत नाटकानं मनात घर केलं होतं. एकदा नाटक पहायला गेलेले असताना त्यांनी त्याच्या मित्राला कलाकारांची रंगभूषा करताना पाहिलं आणि तिथं त्यांच्या मनात रंगभूषेचं बीज पेरलं गेलं.
संतोषनं बालनाट्यांपासून रंगभूषा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक नाटकं, मराठी चित्रपटांसाठी रंगभूषा केली. 'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकासोबतच 'किल्ला', 'एक हजाराची नोट', 'रिंगण', 'देऊळ', 'चि. व. चि. सौ. कां', 'शाळा', 'राक्षस', 'सलाम', 'यंग्राड', 'बाबू बँड बाजा' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांसाठी संतोषनं मेकअप डिझायनर म्हणून काम केलं आहे. त्यासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
मेकअप करणं आणि मेकअप डिझाईन करणं यात फरक आहे. लेखक दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेली व्यक्तिरेखा उभी करणं हे आव्हानात्मक काम आहे. कारण त्यात भौगोलिक स्थिती, शारीरिक ठेवण, काळ या सर्व गोष्टींचा बारकाईनं अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय नाटक आणि चित्रपट ही दोन्ही माध्यमं वेगळी आहेत, हे ओळखून काम करावं लागतं. चित्रपटात विशेष काळजी घ्यावी लागते. कारण कॅमेरा खोटं बोलत नाही. केलेलं काम प्रेक्षकांना अगदी जवळून दिसतं, असं संतोषचं म्हणणं आहे.
बालनाट्य ते हिंदी चित्रपट
'मणिकर्णिका' या चित्रपटासाठी काम करण्याबाबत संतोष म्हणाला की, "हा अत्यंत आव्हानात्मक चित्रपट होता. पहिला हिंदी चित्रपट म्हणून थोडं दडपणही होतं. मात्र, हा चित्रपट करताना खूप गोष्टी शिकताही आल्या. या चित्रपटासाठी मी कशा प्रकारे काम केलं आहे ते प्रत्यक्ष पडद्यावर पहायला मिळेलच. मात्र बालनाट्य ते हिंदी चित्रपट हा प्रवास खूप काही देणारा ठरला,” अशी भावनाही त्याने व्यक्त केली.
हेही वाचा