२०५० पर्यंत दक्षिण मुंबईतील ७० टक्के भाग पाण्याखाली जाण्याची भीती

सन २०५० पर्यंत दक्षिण मुंबईतील ७० टक्के तसंच नरिमन पॉईंट, कफ परेड परिसरातील ८० टक्क्यांहून अधिक भाग पाण्याखाली जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ही भीती व्यक्त केली आहे.

मुंबईला वाचवण्यासाठी राज्य सरकारसह मुंबई महापालिका, एमएमआरडीए व अन्य शासकीय व निमशासकीय संस्था यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार नोव्हेंबर २०२१ पर्यंत 'मुंबई वातावरण कृती आराखडा' तयार करण्यात येणार आहे.

शुक्रवारी मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई वातावरण कृती आराखडा संदर्भात सादरीकरण करण्यात आले. मुंबईची हवा, पाणी, जमीन, प्रदूषण या सर्वांचा अभ्यास करण्यात येत आहे.

पालिकेच्या कुलाबा ए विभाग डोंगरी बी विभाग चंदनवाडी सी विभाग व ग्रँट रोड डी विभागातील ७० टक्के भाग पाण्याखाली जाण्याची भीती आहे. त्यामुळे मुंबईसाठी पालिका प्राधान्याने वातावरण कृती आराखड्यासाठी आपले सहकार्य देईल, असं चहल म्हणाले.

मुंबईत १८९१ नंतर गेल्या १५ महिन्यात तीन चक्रीवादळे आली. याचा कोकणासह मुंबई शहराला मोठा फटका बसला. मुंबई शहरात साधारणता जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत पाऊस होतो. मात्र यावेळी १७ मे रोजी २१४ मिमी पाऊस झाला. त्यामुळे वातावरणामध्ये बदल होत असल्याचं स्पष्ट होतं आहे. पावसाचा लहरीपणा वाढत असून दररोज १०० ते २०० मिमी पाऊस पडण्याचे प्रमाण वाढलं आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

मुंबईत २००७ नंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यात तापमानामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी देखील तापमान वाढ होऊ लागली आहे. दहा वर्षापूर्वी ३५ सेल्सियस डिग्री असलेले तापमान आता ३८ ते ४० सेल्सियस डिग्रीपर्यंत पर्यंत पोहचत आहे.


हेही वाचा

वायुप्रदूषणाचा परिणाम देशातील मोसमी पावसावर

सिमेंट-काँक्रिटच्या भिंतीमुळे वर्सोवा समुद्रकिनारा नष्ट होईल, पर्यावरणप्रेमींची भीती

पुढील बातमी
इतर बातम्या