IMD चा मुंबई, ठाणे, पालघरसाठी आॅरेंज अलर्ट, गडगडाटासह पाऊस पडणार

आठवड्याभरापासून मुंबईकर भयंकर उकाड्याचा सामना करत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी सायंकाळी मुंबई आणि परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाल्याने मुंबईकरांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. शनिवारी देखील ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरूच राहिल, असा आयएमडीचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी आयएमडीने आॅरेंज अलर्ट जारी केला आहे.

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने मुंबई जिल्ह्यात पुन्हा आगमन केलं आहे. मध्यंतरीच्या दिवसांमध्ये पाऊस नसल्याने मुंबईकरांना कमालिच्या उकाड्याचा सामना करावा लागला, दुपारच्या वेळेस कडक ऊन आणि दिवसभर ओघळणाऱ्या घामाच्या धारा यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. घामाने चिंब भिजणाऱ्या मुंबईकरांना पावसाच्या शिडकाव्याने दिसाला दिला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाजही आयएमडीने व्यक्त केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यासाठी देखील आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा- विजांच्या कडकडाटासह मुंबईत पावसाची हजेरी

याआधी ७ सप्टेंबर रोजी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील काही भागांत काही तासांसाठीच पाऊस झाला. परंतु या पावसाने हवेत गारवा आणण्याऐवजी उकाड्यातच भर टाकली होती. परंतु यंदाचा होणारा हा पाऊस मध्ये मध्ये विश्रांती घेत पडतच राहील, अशी शक्यता आहे. परतीला निघालेला हा मान्सून असल्याचंही म्हटलं जात आहे. काही का असेना उष्ण व दमट हवामानात गारवा निर्माण झाला, तरी मुंबईकरांसाठी हे पुरेसं ठरेल.

याआधी आॅगस्ट महिन्यात मुंबईकरांनी मुसळधार पावसाचा अनुभव घेतला. एवढंच नाही, तर आॅगस्टमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने १९५८ पासूनचे  मागचे अनेक विक्रम मोडीत काढले. आॅगस्ट १९५८ मध्ये सांताक्रूझ वेधशाळेने १२५४ मिमी पावसाची नोंद केली होती. परंतु आॅगस्ट २०२० मध्ये १,२४८ मिमी पावसाची नोंद करताना अवघा ६.३ मिमी पाऊस हा विक्रम मोडण्यासाठी कमी पडला. मात्र या पावसाने आॅगस्ट १९८३ मधील १२४४ मिमी पावसाचा विक्रम मोडीत काढला.

हेही वाचा- ऑगस्ट महिन्यातील पावसाने मोडला ४४ वर्षांचा विक्रम
पुढील बातमी
इतर बातम्या