कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून संपूर्ण मुंबईत संचारबंदी लागू केली आहे. यामुळे मुंबईतील रस्त्यांवरील वाहने व गर्दीचे प्रमाण पूर्ण घटलं आहे. रस्ते ओस पडले आहेत. वाहनेच रस्त्यावर नसल्याने मुंबईच्या हवेचा गुणवत्ता स्तर आता उंचावला आहे. सर्वसाधारणपणे वाईट स्तरावर असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक मंगळवारी उत्तम स्तरावर राहिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना गर्दी कमी करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच सोमवारपासून संचारबंदी लागू केली आहे. यामुळे मुंबईतील रस्ते ओस पडू लागले. वाहनांची संख्या कमी झाल्यामुळे हवेतील प्रदूषित घटकांचे प्रमाण घटत गेले. नेहमी मुंबईच्या हवेतील पीएम २.५ चे प्रमाण २०० च्या आसपास किंवा त्याहून अधिक म्हणजे वाईट ते अतिवाईट स्तरावर असते. पण मंगळवारी हे प्रमाण १०० च्या आसपास म्हणजे उत्तम स्तरावर राहिले. तर नवी मुंबईच्या हवेतील प्रदूषित घटकांचे प्रमाण १७८ म्हणजे मध्यम स्तरावर राहिले.
भांडुप, कुलाबा, वरळी, वांद्रे -कुर्ला संकुल आणि चेंबूर येथील हवेची गुणवत्ता उत्तम व समाधानकारक होती. तर मालाड, माझगाव वांद्रे-कुर्ला, बोरिवली आणि अंधेरी येथे हवेची गुणवत्ता मध्यम स्तरावर होती. वांद्रे-कुर्ला संकुलात गेल्या दोन महिन्यात सातत्याने हवेचा गुणवत्ता निर्देशांक अति वाईट स्तरावर होता, त्यामध्ये संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मोठी सुधारणा झाली.
हेही वाचा -
Coronavirus Updates : जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला बाजाराच्या वेळा ठरवून द्या - भाकप
Coronavirus Updates : आता १४ एप्रिलपर्यंत देशातील प्रवासी रेल्वेसेवा बंद