गेल्या अनेक दिवसांपासून वाढणाऱ्या उकाड्यामुळं मुंबईकर प्रचंड हैराण झाले आहेत. अशातच १८ ते २१ मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमान वाढणार असल्याच अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबईचं कमाल तापमान १८ मे रोजी ३३.६ अंश, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं आहे. तसंच, १९ मे रोजी कमाल तापमान ३५ अंश, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
गेल्या आठवड्यात ३२ अंशांदरम्यान असलेला मुंबईतील कमाल तापमान २ दिवसांपासून एक ते दीड अंशांनी वाढलं आहे. गुरुवारी तो ३३ अंशांदरम्यान होता. शुक्रवारी मुंबईत ३३.६ तर उपनगरात तापमान ३३.९ अंशांवर पोहोचलं आहे. कुलाबा वेधशाळेनुसार ८५ टक्क्यांदरम्यान असलेली शहरी भागातील सापेक्ष आर्द्रता शुक्रवारी ९१ टक्क्यांवर पोहोचली आहे. सांताक्रूझ वेधशाळेनुसार उपनगरात ७० टक्क्यांदरम्यान असलेली आर्द्रता ७३ टक्क्यांवर गेली आहे.
या दोन्ही वाढीमुळं उकाडा चांगलाच वाढला आहे. हवामान खात्यानुसार मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. तापमान ४५ अंशांच्यावर गेला आहे. त्यातूनच मुंबईच्या तापमानातही वाढ होत आहे. पुढील ४८ तासांत मुंबई शहर व उपनगरात कमाल तापमान ३५ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात १९ मेपासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात वाढ होणार असल्यामुळे २५ मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याची माहिती मिळते. अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान ४२ अंशाच्या आसपास राहणार असल्याचं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा -
'पंतप्रधानांची पत्रकार परिषद म्हणजे ‘मौन की बात’!' - राज ठाकरे
अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा ५२०० जागा वाढल्या