नवरात्रोत्सवासाठी महापालिकेकडून नियमावली जाहीर, जाणून घ्या 'हे' नियम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

कोरोनाच्या पार्श्वभूमवीर यंदाच्या गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवदेखील अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करणं आवश्यक आहे. त्यासंदर्भात महापालिकेनं नियमावली जारी केलीय.

सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना पूर्वपरवानगी घेणं आवश्यक राहणार आहे. त्यासाठी ऑनलाईन परवानगी यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

  • कोरोना साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता घरगुती तसंच सार्वजनिकरीत्या स्थापन करण्यात येणाऱ्या देवमूर्तींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.

  • देवींची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट आणि घरगुती मूर्तींकरिता २ फुटांपेक्षा जास्त उंचीची नसावी.

  • पारंपरिक देवीमूर्तीऐवजी शाडूची मूर्ती असल्यास विसर्जन घराच्या घरीच करावं, जेणेकरून आगमन/विसर्जनाची गर्दी टाळता येऊ शकते.
  • देवीच्या आगमनासाठी ५ व्यक्तींचा समूह असावा, जे कोविड नियमांचे काटेकोर पालन करतील. तसंच शक्यतो त्या व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेऊन १५ दिवस झालेले असावेत.

  • सार्वजनिक देवीमूर्तींच्या आगमनाच्यावेळी आणि विसर्जनाच्या वेळी १० पेक्षा जास्त लोक नकोत.

  • नवरात्रोत्सवादरम्यान गरब्याचं आयोजन नको, तसंच अन्य धार्मिक कार्यक्रमातही गर्दी होणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे.

  • शक्यतो देवीमूर्तींच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन किंवा फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून दिलेली असावी.

  • तसंच देवी मंडपांमध्ये थर्मल स्क्रीनिंगची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. स्वच्छतेचे नियम पाळणं बंधनकारक राहील.

  • मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण केलेलं असावं.

  • कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणे, फुले, हार अर्पण करणं टाळावं.

  • कोरोना विषाणूची गंभीर आपत्ती लक्षात घेता गर्दी टाळावी, गरब्याचे आयोजन करू नये.
  • मंडपात एका वेळी पाच पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये. तसंच मंडपात मास्क घालणं बंधनकारक असेल. सामाजिक अंतर राखून नियमांचं काटेकोट पालन करावं लागेल.

  • देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाचा कार्यक्रम कमीत कमी लोकांमध्ये पार पाडणं आवश्यक आहे. लहान मुले आणि वरिष्ठांनी सुरक्षेच्या कारणास्तव विसर्जनस्थळी जाणं टाळावं.

  • नैसर्गिक विसर्जनस्थळी देवीमूर्तींचे विसर्जन करताना नागरिकांना थेट विसर्जन करता येणार नाही. नागरिकांना मूर्ती जमा कराव्या लागतील. त्यानंतर पालिकेमार्फत त्यांचं विसर्जन होईल.


हेही वाचा

यंदा गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाची पातळी अत्यंत कमी

गणेश विसर्जनावेळी वर्सोवा इथं ५ मुले बुडाली; २ सापडले, ३ बेपत्ता

पुढील बातमी
इतर बातम्या