मुंबईसह राज्यभरात मागील १० दिवसांपासून गणेशोत्सव साजरा करण्यात आला. रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी सर्वांनी आपला लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला. परंतू, विसर्जनावेळी आपली काळजी घ्या, पाण्यात जास्त पुढे जाऊ नका, असं वारंवार पोलिसांकडून सांगण्यात येत. मात्र, तरिही अनेकजण पोलिसांच्या सुचना न पाळत नाही. अशीच एक घटना रविवारी मुंबईच्या वर्सोवा चौपाटी इथं घडली.
गणपती विसर्जनासाठी गेलेले ५ जण बुडाले. मिळालेल्या माहितीनुसार, या ५ जणांपैकी २ जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं तर, उर्वरित ३ जण बेपत्ता असल्याचं समजतं. रविवारी रात्री अनंत चतुर्दशी दिवशी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पाण्याच्या अंदाज न आल्यानं ही ५ जण बुडाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानकांनी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. यावेळी त्यांना २ जणांना वाचवण्यात यश आलं. मात्र ३ जण अजूनही बेपत्ता असल्याचं समजतं.
वाचवण्यात आलेल्या २ मुलांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच बेपत्ता असलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी दुर्घटनास्थळ आणि आसपासच्या समुद्रात शोधमोहीम राबवली जात आहे. त्यासाठी विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे.