गणेशोत्सवात यंदा सर्वात कमी ध्वनी प्रदूषण पातळीची नोंद झाली आहे. गेल्या १८ वर्षांमधील सर्वाधिक कमी ध्वनी प्रदूषण पातळीअसल्याची माहिती आवाज फाऊंडेशनतर्फे देण्यात आली. कोरोना काळातील निर्बंधांमुळे गेल्या वर्षीही हा आवाज कमी झाला होता. मात्र, या वर्षी त्याची पातळी आणखी कमी असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आलं.
यंदा करोनाच्या काळामध्ये आलेल्या निर्बंधांमध्ये ढोलताशांचाही समावेश होता. दीड दिवसांच्या गणपतीला यंदा फारसा आवाज नव्हता. मात्र, दहाव्या दिवशीही इतर वर्षांपेक्षा या ढोलताशांच्या आवाजात खूप घट झाल्याचं निदर्शनास आलं. यासाठी पोलिसांनी केलेलं नियोजन, महापालिका, गणपती मंडळांचे सहकार्य यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचं आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुलली यांनी स्पष्ट केलं.
रविवारच्या दिवसात अनेक ठिकाणी आवाजाची पातळी अधिक असताना मुख्यत्वे वाहतुकीमुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याचं निदर्शनास आलं. ढोलताशे, स्पीकर याचा यामध्ये समावेश नव्हता.
रविवारी मुंबईत लहान-लहान गल्ल्यांमध्ये टबमध्ये किंवा मंडपामध्येच झालेल्या विसर्जनाच्या वेळी बाप्पााला ढोलताशे वाजवूनही निरोप देण्यात आला. मात्र, इतर वेळच्या तुलनेत हे प्रमाण कमी होते. त्यामुळे दे दिलासादायक आहे, असे निरीक्षण आवाज फाऊंडेशतर्फे नोंदवण्यात आले.
आवाज फाऊंडेशन सन २००३ पासून गणेशोत्सव आणि विविध सणांना होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची नोंद करत आहे. विविध धार्मिक ठिकाणी, राजकीय प्रचारसभा, राजकीय कार्यक्रम, दिवाळी, बांधकाम सुरू असलेल्या जागा, वाहतूक कोंडी, लोकल, विमानतळ अशा अनेक ठिकाणी ही नोंद करून याविषयी सातत्यानं जनजागृती करण्यात येते.
याचे दुष्परिणाम जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक कार्यकर्ते कार्यरत आहेत. याची दखल घेऊन शांतता क्षेत्राबद्दलची जाणीवही लोकांमध्ये अधिक वाढीला लागली.
हेही वाचा