दिवाळाचा फराळ यंदा महागणार, डाळींच्या किंमतीत वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

यंदा दिवाळीनिमित्त फराळ खरेदी करतेवेळी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण अतिरिक्त व लांबलेल्या पावसाचा फटका डाळींना बसला आहे. दिवाळीसाठी तयार करण्यात येणार्या फराळामध्ये महत्वाचं असते ती म्हणजे डाळ. परंतु, यंदा पावसामुळं तूरडाळ वगळता सर्वच डाळींच्या दरात वाढ झाली आहे. हरभरा डाळीच्या किमती वाढत असल्यानं ऐन दिवाळीत लाडू महागणार आहेत.

हरभरा डाळ महागणार

हरभरा डाळीच्या बेसनापासून लाडू तयार केला जातो. या लाडूची मागणीही जास्त असते. परंतु, आता बाजारात हरभरा डाळ व बेसनाच्या मागणीत वाढ होत आहे. पण त्या तुलनेत पीक कमी असल्यानं पुढील आठवडाभरात हरभरा डाळीचं भाव वाढण्याची शक्यता आहे.

हरभऱ्याचं उत्पादन

देशात यंदा १०.०१ दशलक्ष टन हरभऱ्याचं उत्पादन झाल्याचं समजतं. यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १०.८५ टक्के घट झाल्याची माहिती नॅशनल बल्क होल्डिंग कॉर्पोरेशनचा अहवालात देण्यात आली आहे. देशातील डाळीची मागणी जवळपास १२ ते १३ दशलक्ष टन आहे. त्यातच यावर्षी पीक विलंबाने घेतले जात असल्याने हरभरा डाळ व बेसनदेखील महाग होत आहे.

चकलीही महागाणार

उडीद व मुगडाळीच्या उत्पादनात सरासरी १२ टक्के घट झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं ऐन दिवाळीत उडीद व मुगाच्या डाळीचे दर वाढू लागले आहेत. मागील महिन्यात ११० रुपये किलोदरम्यान असलेली मुगडाळ आता १२०च्या घरात गेली आहे. तर उडदाची डाळदेखील ७० रुपयांदरम्यान आहे.


हेही वाचा -

१४ बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी, मुंबईच्या बंडखोरांचा समावेश नाही

वर्ष संपत आलं तरी अकरावीचे प्रवेश सुरूच


पुढील बातमी
इतर बातम्या