राज्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता असून सावधगिरी म्हणून राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन लागू करण्यात येईल, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चर्चेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करताना लाॅकडाऊनसंदर्भात महत्त्वाचे संकेत दिले आहेत. 

महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी कोरोना आणि लाॅकडाऊनवर भाष्य केलं.

हेही वाचा- मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, मागील ५ दिवसांत आढळले ४४६० कोरोनाबाधित रुग्ण

अजित पवार म्हणाले, जगभरात विविध देशांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. काही देशांत पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्याकडेही कोरोनाची दुसरी लाट येईल, असं म्हटलं जात आहे. दिवाळीच्या सणानिमित्त गर्दी होऊ नये म्हणून जनतेला सतर्क राहण्याचं आणि आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. परंतु दिवाळी सणानिमित्त रस्त्यावर प्रचंड गर्दी बघायला मिळाली. आपल्या पुण्यातील बाजीराव रोडवर एवढी गर्दी झाली की, गर्दीत कोरोना चेंगरून मेला की काय असं मला वाटलं, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. 

एकदा कोरोना झाला म्हणजे पुन्हा होत नाही, हे मनातून काढून टाका. कोरोना पुन्हा मानगुटीवर बसू शकतो. त्यामुळे सर्वानी काळजी घ्यावी आणि सर्व नियमांचं पालन करावं. आता कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाकडून येणार्‍या नियमांचे पालन करावं. एवढ्यात लॉकडाऊन होईल, असं म्हटलो, तर जनता घाबरून जाईल. त्यामुळे येत्या ८ ते १० दिवसातील रुग्ण संख्येचा विचार करून, पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा- कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल- राजेश टोपे
पुढील बातमी
इतर बातम्या