Advertisement

कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल- राजेश टोपे

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली, तर ती सर्वांना महागात पडेल, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल- राजेश टोपे
SHARES

दिवाळीनंतर देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या (coronavirus) संख्येत वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली, तर ती सर्वांना महागात पडेल, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

दिल्ली, अहमदाबाद आणि केरळमध्ये दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याचप्रमाणे मागील चार दिवसांमध्ये मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या देखील वाढलेली आहे. याकडे पाहता स्थानिक प्रशासनाकडून जनतेला आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहण्याच्या सूचना सातत्याने करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणे, तोंडावर मास्क घालणे आणि सॅनिटायझेशन याकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशा सूचना देण्यात येत आहेत. 

परंतु या नियमांचं जागोजागी सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. खासकरून दिवाळीच्या काळात सर्वच बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोरोनासंदर्भातील सर्व नियम जनतेने अक्षरश: पायदळी तुडवले. सध्याच्या स्थितीतही बहुतांश लोकं गांभीर्याने वागताना दिसत नाही. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वत:च्या हाताने संकट ओढावून घ्यायचं नसेल, तर राज्यातील जनतेने केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा, असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

हेही वाचा- कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते!- उद्धव ठाकरे

दिल्ली, अहमदाबाद आणि केरळमध्ये प्रामुख्याने कोरोनासंदर्भातील नियमांकडे दुर्लक्ष झाल्यानेच संसर्ग वाढत आहे. राज्य सरकारने सर्व धार्मिक स्थळं खुली केली आहेत. जीम, सिनेमागृह, नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. पुढील आठवड्यापासून राज्यभरात शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत कुणीही कोरोनाला गृहीत धरू नये. सर्वांनी काळजी घ्यावी, स्वंयशिस्त पाळली पाहिजे, तरच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करणं शक्य असल्याचं राजेश टोपे (rajesh tope) यांनी स्पष्ट केलं आहे.

याआधी दिवाळीनंतर पुढचे १५ दिवस जागरुकतेचे आहेत, त्यादृष्टीने सावधानता बाळगा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट (coronaviru) ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील न राहता शिस्तीचं पालन आवश्यक आहे.

मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसूत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल. मास्क न वापरणं ही गोष्ट अजिबात खपवून घेतली जाणार नाही. कारण एक कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण ४०० जणांना बाधित करू शकतो. ते चारशे जण किती जणांना बाधित करतील याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्या विरुद्ध कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा- दिवाळीनंतर पुढचे १५ दिवस जागरुकतेचे- उद्धव ठाकरे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा