कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगर पालिका क्वारंटाईन सेंटरची संख्या वाढवत आहे. यासाठी शाळा, कॉलेज देखील पालिकेनं ताब्यात घेतले आहेत. याशिवाय रीकाम्या सदनिका देखील क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येत आहेत.
पण आता जुन्या चाळीतील आणि झोपडपट्टी रहिवाशांसाठी पुनर्विकासानंतर तयार होत असलेली घरे ताब्यात घेण्याची योजना रद्द करण्याची मागणी होत आहे. बृहन्मुंबई भाडेकरु परिषदेचे सरचिटणीस प्रकाश रेड्डी आणि अध्यक्ष प्रकाश नार्वेकर यांनी मुंबई महानगरपालिकेकडे ही मागणी केली आहे.
बृहन्मुंबई भाडेकरु परिषदेकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे की, शहरात असंख्य टॉवर उभे राहिले आहेत. केवळ गुंतवणुकीसाठी त्यातील अनेक फ्लॅट्स घेऊन ठेवलेले आहेत. जे रिकामी आहेत ते महापालिकेनं घ्यावे. त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योगपती अंबानी कुटुंबियांची मुंबईत २२ मजल्यांची इमारत आहे. पाच जणांचे कुटुंब आहे. एका व्यक्तीला एक मजला दिला तरी १७ मजले उरतात, अशा प्रकारे मुंबईत अनेक श्रीमंतांचे बंगले आहेत. ते कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी ताब्यात घ्या.
कष्टकऱ्यांच्या मुंबईसारख्या शहरात जुन्या चाळीत आणि झोपडपट्ट्यांमध्ये लाखो लोक अनेक पिढ्या राहत आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांचा पुनर्विकास प्रलंबित आहे. आपली घरे रिकामी करुन १०, १५, २० वर्ष ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये घरांच्या प्रतिक्षेत आहेत किंवा अनेक ठिकाणी राहत आहेत. विकासकानं अनेक ठिकाणी घरभाडे देणंही बंद केल्यामुळे ते आधीच अडचणीत आहेत. त्यांना ताबडतोब हक्काची घरं मिळाली पाहिजेत. सरकारनं त्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा